वीर ग्रामस्थ मंडळ,मुंबई ( रजि.) दिनदर्शिका प्रकाशन सोहळा - २०२२ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न !
मुंबई : ( दिपक कारकर )
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अंतिम टोकाचं "वीर" हे एक खेडेगाव होय. गावाला लाभलेलं निसर्गसौंदर्य म्हणजे वीर देवपाट व वीर रानपाट हे धबधबे आणि नयनरम्य असा खाडीकिनारा. मोठी लोकवस्ती असणाऱ्या या गावात १९९० साली स्थापन झालेलं वीर ग्रामस्थ मंडळ ( मुंबई ) उपरोक्त मंडळाने गेली ३१ वर्षे गावच्या उन्नती व एकात्मक विकासासाठी ही संघटना निर्माण करून आजवर अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत गावच्या विकासाला गती दिली आहे.
उपरोक्त मंडळाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा - २०२२ शनिवार दि.०४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०७ वा. वेंकटेश क्लासेस हॉल, सेनापती बापट मार्ग दादर - ( पश्चिम ) येथील सभागृहात मान्यवर व मंडळाचे मुंबई ग्रामस्थांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. मंडळाच्या संकल्पनेतून साकारलेली ही सलग तिसऱ्या वर्षाची गावच्या उन्नतीसाठी संकल्पलेली कल्पना युवकांच्या अथक प्रयत्नांनी आणि जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरली. सोशल मीडियाच्या प्रसार माध्यमांचा योग्यरीत्या वापर करून अगदी घरबसल्या गुगलमीट सभा घेता हा उपक्रम यशस्वी केला. यासाठी मंडळाचे सहसचिव जगदीश जावळे व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली शिवाय या उपक्रमाला मंडळाच्या प्रत्येक सदस्यांनी मोलाचा हातभार लावला.
कार्यक्रमाची सुरुवात थोर समाजसुधारक यांच्या विचारांना अभिवादन व श्री गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मंडळाची आतापर्यंत असलेली वाटचाल याचं सविस्तरपणे वर्णन मंडळाचे सचिव दिपक पवार यांनी आपल्या छान भाषाशैलीत मनोगतात मांडले तर सहसचिव जगदीश जावळे यांनी हा उपक्रम करत असताना फार कमी दिवसात मंडळाच्या पुढाकाराने करताना अनेक हितचिंतक व देणगीदार यांच्या प्रयत्नाने यशस्वी होताना मंडळासाठी काम करण्याची आवड व सोशल मीडियाचा वापर करून पूर्णत्वास हा उपक्रम गेला अशा शब्दांत आपले विचार व्यक्त केले.
मंडळाची २०२२ या नववर्षातील प्रकाशित झालेली दिनदर्शिका एक वेगळाच संदेश देणारी आहे अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी या दिनदर्शिकेचे कौतुक आपल्या मनोगतात व्यक्त केले.
गावच्या विकासात्मक चळवळीला वीर गावच्या उच्च शिक्षित युवकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग वीर ग्रामस्थ मंडळाला होईल यासाठी एकजुटीने काम करत आहेत. प्रतिवर्षी नवीन संकल्पना नवे उपक्रम राबविताना प्रत्येक सदस्य व कार्यकारिणी परिश्रम घेऊन अनेक उपक्रम आजवर राबविण्यात यशस्वी ठरले आहेत.वीर ग्रामस्थ मंडळाची २०२२ या येणाऱ्या नव्या वर्षाची प्रकाशित झालेली दिनदर्शिका युवकांनी छानरित्या गावासमोर आणली आहे.या सोहळ्याला अजित दोंडे (अध्यक्ष - गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघ, मुंबई-नालासोपारा विभाग ), नामदेव दुर्गोळी ( गावचे गावकर), सुरेश भुवड - ( उपाध्यक्ष- वीर ग्रामस्थ मंडळ, मुबई ), दिपक पवार (सचिव- वीर ग्रामस्थ मंडळ), रमाकांत जावळे (उपाध्यक्ष- अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ ), कृष्णा शिगवण ( सल्लागार ) सुरेश जावळे (सल्लागार), रमेश कळके आदी मान्यवर व गावची प्रतिष्ठित मंडळी व सर्व वीर ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सहसचिव दिनेश दुर्गोळी यांनी उत्तमरीत्या केले तर मंडळाचे खजिनदार प्रभाकर दुर्गोळी यांनी सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे आभार मानून आभार प्रदर्शन केले. सातत्याने एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास या ध्येयउद्दिष्टाने कार्य करणाऱ्या वीर ग्रामस्थ मंडळ, मुंबई ( रजि. ) या मंडळाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.


No comments:
Post a Comment