जव्हार- जितेंद्र मोरघा :
यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जून उलटून जुलै महिन्यांच्या प्रारंभी पावसाने खरी सुरूवात केली. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. त्याने जमिनीची योग्य मशागत करुन पेरणी केली होती. जव्हार तालुक्यात शेतकऱ्यांनी वरई, नागली, भात, तूर हि पिके घेतली आहेत. परंतु जुलै महिन्याच्या मध्यंतरी पडलेल्या मुसळधार पावसाने तूर पिकाची पुरती वाट लावली आहे.
शेतकऱ्यांनी नांगणी करुन तुरीची लागवड केली.परंतु तुरीचे पिक जोमात असताना झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची तूर शेतात सडून गेली. हातचे पिक वाया गेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. आधीच ग्रामीण भागात शेती करतांना खर्चासाठी रोजगाराचे साधन नाही. शेती हाच व्यवसाय समजून पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. मात्र झालेल्या अतिवृष्टीने तूर पिकाच्या नुकसानीमुळे बळीराजाचा तोंडचा घास हिरावला आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
बाजारपेठेत गेल्या वर्षी हि तूरीचे उत्पादन घटल्यामुळे तुरडाळीने शंभरी ओलांडली होती. यावर्षी हि तूर पिक घटल्याने घाऊक बाजारपेठेत तूरडाळीचे दर वधारु शकतात. माञ पावसाने तूर पिकाच्या झालेल्या नुकसानीने जव्हार तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर पिकाच्या नुकसानीचे कृषि विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी बळीराजाने केली आहे.
"आम्ही यंदाच्या वर्षी तुर पिकाची पेरणी वेळेवर केली होती.परंतु यंदा आठवडा भर खुप पाऊस पडल्यामुळे आमच्या राबात तुर पिकाची काडी सुध्दा वाचली नाही. तरी शासनाने तुर पिकाचे पंचनामे करुन आम्हांला नुकसान भरपाई मिळावी".
--बाबन मोरघा, शेतकरी (विनवळ) जव्हार.
No comments:
Post a Comment