प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या त्वरित सोडवाव्यात - विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
** विभागीय लोकशाही दिनात पाच प्रकरणांवर सुनावणी
पुणे, प्रतिनिधी :- प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्या सोडवाव्यात आणि नागरिकांना लोकशाही दिनामध्ये त्यांची तक्रार दाखल करावी लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा ऊंटवाल, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे विभाग मुख्य अभियंता संदिप खलाटे, सहसंचालक उच्च शिक्षण मयुरेश जोशी यावेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या पाच प्रकरणांवर यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या. तसे न केल्यास अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन कारवाई करण्याचे आणि पुढील सुनावणीमध्ये समक्ष उपस्थित राहण्याचे आदेशित करण्यात येईल असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment