Tuesday, 6 May 2025

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !!

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण, इंदिरानगर येथे एक धक्कादायक घटना घडली यात दारूला पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या भांडणात एकोणीस वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू....

कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात.निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास (5 एप्रिल) घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला. त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला . थोड्याच वेळात गुलाम शेखचा मुलगा अब्दुल शेख व त्याचे साथीदार शोएब शेख, अजिज शेख आणि शाहिद शेख यांनी सय्यद कुटुंबाच्या घरात घुसून निसार सय्यद यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नी आणि मुलगी सानिया यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली. यादरम्यान अब्दुल शेख याने लाकडी दांडक्याने सानिया हिच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी सानियाचा काही वेळातच मृत्यू झाला.

या प्रकरणात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख, त्याचा मुलगा अब्दुल शेख, शोएब शेख, अजिज शेख आणि शाहिद शेख यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Monday, 5 May 2025

सिद्धार्थ महाविद्यालयात 'इस्त्रायलची संस्कृती, राष्ट्रभक्ती व युद्धाविषयी भूमिका' यावर कार्यशाळा संपन्न !

सिद्धार्थ महाविद्यालयात 'इस्त्रायलची संस्कृती, राष्ट्रभक्ती व युद्धाविषयी भूमिका' यावर कार्यशाळा संपन्न !

सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व ज्यूइश एजन्सी ऑफ इज्राइल (Consolute General of Israil, Mumbai) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी इज्राइल डिफेन्स सर्व्हिसेस मधील सैनिकांचे युद्धविषयक अनुभव कथन, देशाभीमान, सैनिकी प्रशिक्षण, सैन्यात दाखल होण्यासाठी लागणारी मासिकता, परराष्ट्र धोरण, समाज माध्यमे, वयाच्या १८ वर्षा नंतरचे ३ वर्ष सक्तीचे सैनिकी प्रशिक्षण या बाबत चर्चासत्र, प्रश्नमंजुषा माजी उपप्राचार्य डॉ. सुनिल कांबळे व डॉ. शशिकांत मुंढे यांच्या प्रयत्नामुळे दि. २ में, २०२५ रोजी दुपारी अस्तित्वात येऊ शकले. सिद्धार्थ महाविद्यालयाचा हा विदेशी दूतावासाबरोबरचा दुसरा संयुक्त कार्यक्रम आहे.

*जास्तीत जास्त तरुण तरुणींनी सैन्यदलात भरती होऊन देशसेवेचे व्रत स्वीकारावे हा मुख्य उद्देश समोर ठेवून सिद्धार्थ वाणिज्य व इजरायल दूतावासाने हा संयुक्त परिसंवाद आयोजित केला होता.*

*कॉन्स्युलेट सौ. नोम ओव्हना* यांनी आपल्या भाषणात भारत इज्रायल  यातील सौधारयपूर्ण सांस्कृतिक संबंध यावर भाष्य केले. *'भारत माझा आवडता देश आहे*' हे आवर्जून सांगितले. *समंथा रॉबिन्सन* (डायरेक्टर ऑफ ग्लोबल पार्टनरशिप) यांनी राष्ट्रीयत्व, नागरी जागरूकता, परराष्ट्रीय धोरण या विषयावर श्रोत्यांना सजग केले. *सौ ताल मोकोव्हीटस* यांनी आपल्या युद्ध अनुभवातील दाहकता वेगवेगळ्या प्रसंग नुसार कथन केले. "नेशन फर्स्ट" हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती सैनिकी प्रशिक्षण घेताना आवश्यक आहे हे ठासून सांगितले. *श्री. नोम कूपर* यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तर दिली तसेच एन. डी. ए. प्रशिक्षण व इजरायली सैनिकी शिक्षण व्यवस्था यातील फरक स्पष्ट केला.

या कार्यक्रमाचे सक्रिय मार्गदर्शक *प्राचार्य प्रा. डॉ. यु. एम. मस्के* यांनी आपल्या भाषणात भारत इज्रायल मैत्री, तंत्रज्ञान, युद्धनीती या विषयावर सखोल विवेचन केले. *प्रा. डॉ. समीर ठाकूर* यांनी प्रास्ताविक केले व जागतिक घडामोडीतील भारत इज्रायल तंत्रज्ञान अदानप्रदान धोरण या विषयावर श्रोत्यांना संबोधित केले. *डॉ. शशिकांत मुंढे* हे या चर्चासत्राचे समन्वयक होते, आपल्या आभार प्रदर्शनात त्यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना व आंतरराष्ट्रीय सामंजस्य हे भारत - इज्रायल मैत्रीपूर्ण संबंधाचे गमक आहे हे अधोरेखित केले.

या चर्चासत्रात, पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रसायनी., अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मालाड,. रुईया कॉलेज, प्रगती कॉलेज, रॉयल कॉलेज- डोंबिवली, सिद्धार्थ वाणिज्य कॉलेज एम कॉम विभाग, सिद्धार्थ आर्ट्स कॉलेज येथून सुट्टया असताना पण ४३ मुले मुली हजर होत्या. तसेच प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे हे देखिल सहभागी झाले होते.

*-डॉ. विष्णू भंडारे (मुंबई प्रतिनिधी)*

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !!

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !!

*** आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश!
 

मुरबाड, प्रतिनिधी - कल्याण -माळशेज घाट -आळेफाटा राष्ट्रीय महामार्ग वरील पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, हा राष्ट्रीय महामार्ग आहे कि नाही अशी स्थिती या रस्ता दूरूस्ती साठी १ मे २०२५ रोजी रास्ता रोको करून‌  आंदोलनाचा इशारा आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने दिल्यानंतर NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विभाग) खडबडून जागे झाले व प्रथम खड्डे दूरूस्ती व नंतर प्रत्यक्ष माळशेज घाटातील संपूर्ण रस्ता डांबरीकरण शुभारंभ आज करण्यात आला, रस्ता डांबरीकरण शुभारंभाला मुरबाड आमदार किसन कथोरे उपस्थित होते यावेळी स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी  त्यांचे औक्षण करत स्वागत केले तसेच आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे, संस्थेच्या वतीने पुणेकर - नगरकर टोपी परिधान करून, फटाके फोडत, पेढे वाटत आनंद साजरा करत आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने आभार व धन्यवाद मानण्यात आले. 

यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर म्हणाले रस्ता बाबत शिष्टमंडळ भेटल्यावर आमदार किसन कथोरे यांनी जी तत्परता दाखवत कार्याला सुरुवात केली ती खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच नेतृत्व असून त्यांना पाचव्यांदा मिळालेली संधी हेच त्यांच्या कार्याचे यशाचे गमक आहे.

आम्ही नगरकर कार्याध्यक्ष, स्फूर्ती फाउंडेशन बजरंग तांगडकर म्हणाले लहानपणी माळशेज घाट मधून जातानाचा प्रवास आणि आता मागील काळात माळशेज घाटा मधून प्रवास करताना पर्यटन वाढीसाठी केलेले आमदार किसन कथोरे यांनी केलेले प्रयत्न बघण्यासारखे असून, रस्ता दूरूस्ती साठी शिष्टमंडळ निवेदन द्यायला गेलो परंतु संपूर्ण रस्ताच डांबरीकरण करू, आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली हि आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला ऊर्जा व‌ प्रेरणा देणारी आहे आणि आज काम सुरू झाल्यानंतर झालेला आनंद आम्हाला गगनात मावेनासा आहे  व शब्दात व्यक्त करता येणार नाही.
आमदार किसन कथोरे म्हणाले नगरकरांच्या संघर्षाला मुरबाडकरांनी साद घातली, मी शब्दाला जागणारा आणि काम पूर्णत्वास नेणारा माणूस आहे. आज माळशेज घाट डांबरीकरण काम सुरू झाले परंतु यानंतर वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा माळशेज घाट मधील संपूर्ण रस्ता सिमेंटकरण करण्यात येईल, तसेच माळशेज टनेल रस्ता डि पी आर तयार झाला असून, लवकरच काम सुरू होईल यामुळे नागरिकांनी याचा फायदा होईल, जगातील सर्वात उंच काचेचा ब्रिज, हरिश्चंद्र गड रोपवे, हेलिपॅड सुविधा ज्यामुळे देशातील नागरिकांना थेट माळशेज पर्यंत पोहचण्याची सुविधा होईल या पर्यटन माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होईल अशी विविध कामे प्रगतीपथावर असून माळशेज घाट पर्यटन वाढीसाठी साठी कायम प्रयत्नशील रहाणार आहे अशी माहिती दिली.

यावेळी आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, अध्यक्ष मंगेश शेळके, कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, संचालक मंडळ पदाधिकारी प्रशांत आहेर, तानाजी कर्पे, हिरा आवारी, विरेंद्र जाधव, बजरंग ढोकरे, विजय हासे, विक्की फापाळे, नितिन भराट, शशिकांत पात्रे, अमोल वाकळे आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी व मुरबाडकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 3 May 2025

आदिवासी समाजासाठी ‘पीएम जनमन’ व ‘आभा’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी समाजासाठी ‘पीएम जनमन’ व ‘आभा’ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

*** खालापूर येथे आदिवासी संवाद मेळावा संपन्न; कातकरी समाजासह आदिवासी कुटुंबांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध

रायगड, प्रतिनिधी - केंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प आहे. त्यासाठी १३ विभागांच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके  यांनी खालापूर येथे दिले.

खालापूर येथे आयोजित आदिवासी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात मतदारसंघातील  आमदार महेश बालदि, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएम जनमन’ सारख्या धोरणात्मक योजनांच्या माध्यमातून कातकरी व इतर आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारने सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘आभा’ योजना जाहीर केली असून, तिचा १०० दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहॆ. शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 कार्यक्रमापूर्वी मंत्री महोदयांनी तीन तालुक्यांतील  स्थानिक आदिवासी समाजाशी संवाद साधून योजनांची अंमलबजावणी कशी होते आहे याचा आढावा घेतला. त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, "ही वाटचाल निश्चितच आदिवासी समाजाला समृद्धीकडे घेऊन जाणारी आहे."

या संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांसाठी गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक !!

बांधकाम व्यावसायिकांसाठी गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक !!

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरू असलेले विकास प्रकल्प व बांधकामांसाठी वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम-२०१३ नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बांधकामांसाठी बांधकाम नकाशे व आराखडे मंजूर झाल्यानंतर बांधकामांच्या तळघर खोदाईकरिता उत्खनन व वाहतूक करावयाची असल्यास तसेच बांधकामासाठीही गौणखनिजाची आवश्यकता असल्यास अशी परवानगी घेणे आवश्यक आहे. ५०० ब्रासपर्यंत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदारांना असून उपविभागीय अधिकाऱ्यांना ५०१ ते २ हजार ब्रासपर्यंत आणि २ हजार १ ते २५ हजार ब्रासपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

परवानगीसाठी https://mahakhanij.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ऑटो डीसीआर प्रणाली ही महाखनिज प्रणालीशी एपीआयद्वारे जोडणी करण्यात आली असल्याने महानगरपालिका हद्दीतील प्रकल्पांसाठी पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

१ मे जागतिक कामगार दिनी कामगार कष्टकर्यांचा मेळावाकल्याण येथे उत्साहात साजरा !!

१ मे जागतिक कामगार दिनी कामगार कष्टकर्यांचा मेळावा
कल्याण येथे उत्साहात साजरा !!

कल्याण, दि. ३ मे २०२५
    महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती कल्याण जिल्हा ठाणेच्या वतीने दिनांक १ मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृह कल्याण येथे संपन्न झालेल्या मेळाव्यात कॉम्रेड कृष्णा भोयर हे  अध्यक्षस्थानी होते. . या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कॉम्रेड उदय चौधरी उपाध्यक्ष (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस), कॉम्रेड जगदीश खैरलिया (सरचिटणीस, श्रमिक जनता संघ), कॉम्रेड उमेश बोरगावकर (मुन्सिपल कामगार कर्मचारी सेना), कॉम्रेड ज्ञानेश पाटील (महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार युनियन) यांची मेळाव्यात भाषणे झाली.

         कामगार मेळाव्याचे प्रास्ताविक करताना *कॉम्रेड उदय चौधरी* यांनी जागतिक व भारतीय कामगार चळवळीचा इतिहास सांगितला, कामगार चळवळ टिकवून ठेवण्यसाठी कामगारांनी एकत्रित संघर्ष कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये नवीन जन सुरक्षा कायदा येऊ घातलेला आहे. तो कामगार चळवळीतील कार्यकर्त्या करीता कसा मारक आहे याबाबत त्यांनी विश्लेषण केले. केंद्र सरकारने तयार केलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्याला जबरदस्त विरोध कामगारांनी एकत्रितपणे केला पाहिजे व कामगार चळवळ टिकवली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

         *कॉम्रेड गिरीश भावे* सचिव कामगार एकता कमिटी संबोधित करताना म्हणाले की,कामगाराच्या संघर्षातून एक मे हा कामगार दिन निर्माण झालेला आहे.कामगारांनी संघर्ष करून कामाचे आठ तास निश्चित केलेले आहे. कामगाराचा लढा हा खरा भांडवलशाहीच्या विरोधात आहे.ऑक्टोंबर क्रांतीचा इतिहास हा जगातील भांडवलशाहीच्या विरोधात होता.आज भांडवलशाही प्रबळ होत चाललेली आहे. तिला रोखण्याकरीता कामगार कष्टकऱ्यांच्या हातात सत्ता आली पाहिजे व त्याकरिता आपण रस्त्यावर संघर्ष केला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
       
        *कॉम्रेड जगदीश खैरालिया* मेळाव्यास संबोधित करताना म्हणाले की, कष्टकऱ्यांच्या श्रमामुळे हा देश उभा आहे. श्रमिकांनी आपले श्रम वेचून या देशाच्या संपत्तीची निर्मिती केलेली आहे. सध्या सत्तेत असलेल सरकार श्रमिकांनी निर्माण केलेली संपत्ती भांडवलदारांना विकत आहे व ती विकण्यासाठी भांडवलशाहीला पूरक असे कामगार कायदे तयार करत आहे.त्यामुळे कामगार चळवळ अधिक मजबूत करून भांडवलशाहीच्या विरोधात लढा उभाराला पाहिजे. यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 

    
        *कॉम्रेड उमेश बोरगावकर* संबोधित करताना म्हणाले की, आपण ज्या उद्योगात काम करतो तो उद्योग टिकवणे, त्याची भरभराटी करणे, ते उद्योग भांडवलदाराच्या ताब्यात जाणार नाही याकरिता सतत संघर्ष करणे याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. एक मे कामगार दिवस हा कामगाराच्या संघर्षाचा अस्तित्वाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार मोठे आहे.
 
       *कॉम्रेड ज्ञानेश पाटील* घरेलू कामगाराचे नेते संबोधित करताना म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटित क्षेत्रातील कामगारांनी पुढे आले पाहिजे. त्याचीच आज गरज आहे असे ते म्हणाले.
   
      *कॉम्रेड कृष्णा भोयर* संबोधित करताना म्हणाले की, आपल्या देशामध्ये कामगार दिवस हिंदुस्तान कामगार किसान पक्षाने दि.१ मे १९२३ साली प्रथम चेन्नई येथे साजरा केला. जगातील कामगारांनी भांडवलशाहीच्या विरोधात संघर्ष करून रक्तरंजित क्रांतीनंतर कामाचे ८ तास व जगण्याचा हक्क कामगारांना मिळवून दिला. स्वातंत्र्या पूर्वकाळात इंग्रजांनी काही कामगार कायदे केले, स्वातंत्र्यानंतर काही कामगार कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमाने निर्माण केले तर काही कामगार कायदे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियननी वेळोवेळी सरकारशी संघर्ष करून निर्माण केले. हे सर्व कामगार कायदे सत्तेत असलेल्या सरकारने बदलेले आहे. बदललेले कामगार कायदे लागू करण्याकरीता केंद्र सरकार सध्या धडपड करत आहे. कामगार कायदे बदलल्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्काचे हनन होणार आहे. सरकारने कामगार संघटनांना विश्वासात न घेता कामगार कायद्यामध्ये बदल करून ४ नवीन लेबर कोड तयार केलेले आहे. हे लेबर कोड कामगार विरोधी आहे व भांडवलदारांना कामगारांचे शोषण करण्यास मुक्त परवाना देण्यासारखे आहे.
      
         महाराष्ट्र सरकारने नवीन जनसुरक्षा विधेयक पास करण्याकरीता प्रयत्न सुरू केला आहे. या विधेयकामुळे संविधानाने सरकारच्या धोरणावर बोलण्याचा दिलेला अधिकार संपुष्टात येणार आहे. देशातील व राज्यातील सरकारचे धोरणे हे कामगाराच्या विरोधात असून भांडवलदारांच्या बाजूने आहे. सर्व सरकारी संस्था मधील कायम स्वरूपाचा रोजगार संपुष्टात आणून कंत्राटी पद्धतीने कामगार भरती मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहे. स्थायी स्वरूपाची रिक्त पदे ठेवल्या जात आहे.त्या ठिकाणी कंत्राटी कामगाराची नेमणूक आर्थिक शोषण करण्यात येत आहे. देशातील जनतेच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्ती केंद्र सरकार खाजगी भांडवलदारांना कवळीमोल भावाने विकत आहे. ही फार मोठी धोक्याची घंटा भारतीय कामगार चळवळीसाठी आहे. श्रमिका साठी तयार केलेल्या कामगार कामगार कायद्याच्या रक्षणासाठी १० केंद्रीय ट्रेड युनियनने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये भागीदारी करावी असे आव्हान त्यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.

Friday, 2 May 2025

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील भांबेड गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वाघजाई तरुण विकास मंडळ- नार्डेकरवाडी (रजि.क्र.जी.बी.बी.एस.डी. ९७८) तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिन आणि श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन वैशाख शु.१४, रविवार दि. ११ मे २०२५ रोजी मु.पो.भांबेड (नार्डेकरवाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की, शुक्रवार दि.९ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता वाडी मर्यादित किर्केट चे सामने, शनिवार दि १० मे २०२५ रोजी दुपारी ३ वा.महिलांसाठी हळदी -कुंकू आणि रात्री ९ वा.लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स / नाटक तर रविवार दि.११ मे २०२५ रोजी स. ५ ते ६ वा.काकड आरती, स.९ ते ११ वा. सत्यनारायण महापुजा, ११ ते १२ वा. सार्वजनिक आरती, दु.१२ ते २ वा. महाप्रसाद (भंडारा), दु.३ ते ६ वा. सांस्कृतिक स्पर्धा, संध्या.६ ते ७ वा. आरती, रात्री ७ ते ८ वा. सुसंगीत भजन, रात्री ९ ते १० वा. गुणगौरव व सत्कार समारंभ, रात्रौ १०.०० वा. लोकनाट्य बहुरंगी नमन-सोबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ मोर्डे, गवळीवाडी वग नाट्य - राज गादिचा लालसा (सख्खा भाऊ पक्का वैरी)चे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रम साठी स्वागतोत्सुक म्हणून श्री. देवराम पांडुरंग नार्डेकर (वाडीप्रमुख), श्री. सुरेश मनोहर मोसमकर (अध्यक्ष), श्री.सुनिल शांताराम नार्डेकर (सचिव), श्री.योगेश उमाजी नार्डेकर (खजिनदार) आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, वाडीतील सर्व महिला-पुरुष, युवक-युवती, आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद तसेच किलबिल कंपनी सज्ज रहाणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमचा गावातील नागरिक, माहेरवाशिनी, पाहुणे मंडळी यांनी लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण श्री वाघजाई तरुण विकास मंडळ - नार्डेकरवाडी, समस्त मुंबई व ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे. सर्व सन्माननीय देणगीदार आणि हितचिंतक यांचे मंडळने आभार व्यक्त करत आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा (भंडाऱ्याचा) लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ तर्फे करण्यात आले आहे.

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !!

दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात वडिलांना वाचविताना मुलीचा मृत्यू‌ !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण, इंदिरानगर ...