पुन्हा वाहनतळ घोटाळा, कंत्राटाशिवाय वसुली !
'अनधिकृत पावती देत पालिकेच्या महसुलाला चाट'......
अंबरनाथ : प्रस्तावित असलेल्या वाहनतळांचा प्रश्न मार्गी लावताना पालिका प्रशासनाला यश येताना दिसत नाही.
मात्र त्याच वेळी कोणत्याही निविदेची वाट न पाहता अंबरनाथ पश्चिमेतील रेल्वे स्थानकाशेजारील वाहनतळावर काही व्यक्तींनी बनावट पावत्या छापून वाहनचालकांकडून बेकायदा वसुली सुरू केली आहे.
टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या ठिकाणी बेकायदा वसुली सुरू असून त्यातून पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांत वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. त्यावर उपाय म्हणून शहरातल्या पालिकेच्या अखत्यारीतील वाहनतळ सुरू करणे आवश्यक आहे. मात्र शहरातील वाहनतळांचा प्रश्न मार्गी लावण्यात अंबरनाथ नगरपालिकेला यश येताना दिसत नाही.
त्यातच निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच शहरातील पश्चिमेला स्थानकाशेजारी असलेल्या भूखंडावर बेकायदा वाहनतळ वसुली सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाहनतळाचा ताबा काही व्यक्तींनी घेतला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या एका बडय़ा नेत्याच्या आशीर्वादाने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
येथे येणाऱ्या वाहनचालकांकडून प्रति वाहन १५ रुपयांची वसुली केली जाते. सुमारे ८०० ते एक हजार दुचाकींची क्षमता असलेले हे वाहनतळ प्रवाशांसाठी अगदी सोयीचे आहे. त्यामुळे सरासरी ८ ते १० हजार रुपयांची दररोजची वसुली या ठिकाणी होत असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे प्रतिमाह ६ ते ८ लाखांपर्यंतची वसुली या ठिकाणी होते.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

No comments:
Post a Comment