स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा जवळ अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.!
भिवंडी, दिं,15, अरुण पाटील (कोपर) :
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा जवळ जळगावच्या शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात जळगावच्या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सुनील हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेतकरी आहे. मका, सोयाबीन खरेदी व्यवहारात नडला गेल्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
संबंधित शेतकऱ्याला मंत्रालय पोलीस आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतीत मोठं नुकसान झालं आहे. घर गहाण पडलं आहे. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.
मुख्यमंत्री आपलं मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली आणि सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे.
No comments:
Post a Comment