लहुजीनगर येथील अण्णाभाऊ साठे शाळेच्या जागेवर पार्किंगला रहिवाशांचा विरोध !!
"शाळेला वाचविण्यासाठी मालनबाई साठे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले."
मोहोने,संदीप शेंडगे : लहुजी नगर येथील अण्णाभाऊ साठे शाळेच्या जागेवर पार्किंग उभारण्याला लहुजी नगर येथील रहिवाश्यांनी जोरदार विरोध केला असून शाळेच्या जागेवर पार्किंग कदापि होऊ दिली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
लहुजी नगर ही वस्ती सुमारे ७० ते ७५ वर्षांपासून एन आर सी कंपनीच्या रेल्वे पटरीच्या बाजूला लागून असलेल्या एन आर सी कंपनीच्या जमिनीवर वसलेली आहे. या ठिकाणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची अण्णाभाऊ साठे प्राथमिक विद्यालय नावाची शाळा अस्तित्वात होती, परंतु गेल्या काही वर्षापासून या शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे सध्या ही शाळा बंद पडली आहे. येथील समाजसेवक ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या शाळेच्या पटांगणामध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी नियमितपणे ध्वजारोहण करीत असतात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम होतात.
परंतु मंगळवारी अचानक काही इसमांनी शाळेच्या मैदानात खोदकाम करण्यास सुरुवात केली येथील रहिवाशांनी खोदकाम करणाऱ्यांना तुम्ही या ठिकाणी काय करत आहात असे विचारले असता त्यांनी सांगितले आम्ही या ठिकाणी पार्किंग उभी करणार आहेत. शाळेच्या मैदानात पार्किंग उभी करणार ही बातमी वाऱ्यासारखी लहूजी नगर मध्ये पसरली थोड्यावेळात लहुजी नगर येथील सर्व समाजसेवक ३०० ते ४०० नागरिक व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक या मैदानात जमा झाले रहिवाश्यांनी पार्किंगला जोरदार विरोध करीत पार्किंगचे काम थांबवले.
थोड्याच वेळात खडकपाडा पोलीस ठाण्याची गाडी आणि मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा मैदानात उपस्थित झाला जमा झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मागे हटण्यास सांगितले. या जागेत पार्किंग करायचे असून तुम्ही पार्किंगला विरोध करू नका तुम्ही इथून निघून जा असे पोलिसांनी सांगितले परंतु रहिवाशांनी मागे हटण्यास जोरदार विरोध केला. येथील समाज सेवक मालनबाई साठे यांनी पोलिसांसमोरच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले तसेच तुम्ही इथून निघून गेले नाहीत तर मी स्वतःला जाळून घेईल अशी आक्रमक भूमिका घेतली.
शेकडोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने पोलिसांना जोरदार प्रतिकार करत कारवाई थांबवली. आम्ही शाळेच्या जागेत बेकायदेशीर पार्किंग कदापि होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला होता. रहिवासी आक्रमक होत असल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख राहुल कोट यांनी पोलिसांना कारवाई थांबविण्याची विनंती केली. पोलीस आयुक्त आणि सहा. पोलिस उपायुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनी कारवाई थांबवली.
No comments:
Post a Comment