वालधुनी नदी संवर्धनासाठी लहान बजेट असलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका प्रामाणिक पणे काम करीत असताना, "कडोमपा ठरतेय मोठ्या घराचा पोकळ वासा"...
कल्याण, नारायण सुरोशी : वालधुनी नदी.. दोन महानगरपालिका आणि एका नगरपालिका क्षेत्रातून वाहते. त्यातील अंबरनाथ नगरपालिका आणि उल्हासनगर महानगरपालिका अतिशय प्रामाणिकपणे या नदी संवर्धनासाठी काम करताना दिसत आहेत. त्यांचे प्रयत्न जरी त्यांच्या बजेट च्या मानाने तोकडे पडत असले तरी त्यांचा हेतू प्रामाणिक आहे हे त्यांनी वेळोवेळी कृतीतून दाखवून दिले आहे. मग ते दर तीन महिन्यांनी नदीतील गाळ काढण्याची प्रक्रिया असो अथवा नागरिक आणि संस्थांच्या माध्यमातून नदी संवर्धनासाठी केलेली कामे असोत. नेहमीच या दोहींचा प्रामाणिक हेतू अधोरेखित झालाआहे.
असे असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, उल्हास नदी आणि वालधुनी नदी यांच्या संगमा नजिक वास्तव्यास असताना, आणि या नदीच्या पुराचा अधिक फटका कडोमपा क्षेत्रातील नागरिकांना बसत असताना महापालिका प्रशासन नागरिकांनी केलेल्या सुचनांना थेट केराची टोपली दाखवत आहे. अशी येथील कार्यकर्त्यांची भावना व अनुभव झालेला आहे.
नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी नागरी सुविधा केंद्राद्वारे अनेक निवेदने देण्यात आली़. या नदीतील गाळ काढण्यात यावा अशी मागणी,शहर अभियंता सपना कोळी मॅडम यांना गेल्या सहा महिन्या पूर्वी प्रत्यक्ष भेटून करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष नदी किनारी येऊन पाहणी करते असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना परत भेटून याचे स्मरण करून देखिल त्यांना कडोमपा क्षेत्रातील नदीची पाहणी करण्यासाठी अद्यापि वेळ मिळालेला नाही. त्यानंतर वालधुनी नदी स्वच्छता समिती तर्फे आयुक्त साहेबांना वालधुनी नदी संबंधी चर्चा करण्यासाठी लेखी स्वरुपात रीतसर मागणी करण्यात आली.
त्यांच्याकडून देखिल कित्येक महिने कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वालधुनी नदी स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या या अनास्थेबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या वालधुनी नदी संवर्धनाकडे दुर्लक्ष करण्याच्या कार्यशैलीचा निषेध करण्यासाठी, निवेदन घेऊन आयुक्त श्री सूर्यवंशी यांच्या केबिन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता सर्व पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांकरवी मज्जाव करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, सुनिल उतेकर, विनोद शिरवाडकर, गणेश नाईक, पंकज डोईफोडे, नितीन गायकवाड, अनिल गायकवाड, भीमय्या ई.कार्यकर्ते उपस्थितीत होते. शेवटी आयुक्तांना न भेटताच, सहाय्यकांना निवेदन देऊन पदाधिकाऱ्यांना परतावे लागले. या निवेदनात महापालिकेच्या सुस्त प्रशासना विरोधात स्वच्छता समिती तर्फे तीव्र नागरी आंदोलने उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.


No comments:
Post a Comment