पालिका आयुक्तांचा सत्कार नागरिकांना पाणी मिळत नसल्याने काही जण करत आहेत का? "भाजप आमदार चव्हाण यांचा टोला"
डोंबिवली, हेमंत रोकडे :
२७ गावांतील पाणी प्रश्नांवर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी थेट पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर टीका केली. काही जण आयुक्तांचा सत्कार करतात ते कशासाठी.. नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणून ..हे आता थांबलं पाहिजे, याचा जाब नागरिकांनी विचारला पाहिजे असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत भूमिपूजन केल्यानंतर लगावला.
भाजप माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने पाथर्ली येथील जलकुंभाच्या खाली संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, युवा मोर्चा पदाधिकारी मितेश पेणकर, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, अनिल ठक्कर, डोंबिवली पूर्व महिला आघाडी उपाध्यक्ष दमयंती भानुशाली यासह अनेक पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, या प्रभागात १०० टक्के विकास कामे होणे आवश्यक होते. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे हे काम झाले नाही. हे नागरिकांना सांगणे आवश्यक आहे. नामदेव पथपासून पाथर्ली रस्त्यावरून आईस फँक्ट्ररीपर्यतचा रस्ता काँक्रीटीकरण कामाचा निधी का रद्द झाला. नागरिकांनी याचा जाब विचारला पाहिजे.
२७ गावातील पाणी प्रश्नांबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, केंद्र, राज्य व पालिका निधीतुन वेळवर काम पूर्ण करता यावे यासाठी शासनाने पालिका आयुक्तांना पाठवलं आहे ना मग ही कामे कशी होत नाहीत. जनतेला पाणी मिळत नाही म्हणून काहीजणांनी आयुक्तांचा सत्कार केला आहे का असा प्रश्न पडतो.
पुढे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. येथे संरक्षक भिंत नसल्याने रात्रीच्या वेळी दारुडे, नशेबाज येत असल्याने आजूबाजूकडील नागरिकांना त्रास होत होता. आता संरक्षक भिंत बांधली जाणार असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही असे आश्वासन देतो. पाथर्ली येथील स्मशानभूमी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २५०० रुपये आकारले जातात. परंतु ओली लाकडे, रॉकेल, साफसफाई याबाबत अनेक वेळेला पालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. पण याकडे कानाडोळा झाला. तर कार्यकर्ते ठक्कर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर अंत्यसंस्कारासाठी मोफत सामुग्री उपलब्ध करून दिली पाहिजे यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली.
चौकट :-
स्मशानभूमीत दारूची पार्टी.. पोलिसांचा कानाडोळा..
डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली स्मशानभूमीत रात्री काहीजण दारू पीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली जगत असून स्थानिक पोलीस मात्र यांच्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक असून त्याच्याही जीवाला धोका आहे. स्मशानभूमीत सुरक्षा रक्षकासाठी केबिन बनविली नसल्याने रात्रीच्या वेळी काम करताना जीव मिठीत घेऊन काम करावे लागते असे येथील सुरक्षा रक्षकाने सांगितले.
----------------------------------------
प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडणूक द्या...
आमदार चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना विंनती करत भाजप कार्यकर्ता सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. या भागातील आधारकार्ड शिफारसीसाठी निलेश म्हात्रे, अनिल ठक्कर यासारखे सच्चे कार्यकर्ते नागरिकांच्या सेवेसाठी कायम पुढे असतात. म्हणूनच नागरिकांनी प्रामाणिक व सच्चा कार्यकर्त्याला मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment