मुंबई, (शांताराम गुडेकर) :
स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटत असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशी करदाते सुविधांपासून वंचित आहेत. संगमेश्वर रेल्वे प्रशासनाने स्थानकातील प्रवांसांच्या हक्काचा निवारा काढून घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना भरपावसात भीजत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे कोकणवासियांवर स्वातंत्र्य मिळूनही सरकारी अनास्थेचे फटका सहन करावा लागत आहे. संगमेश्वर स्थानकातील विविध सुविधांबाबत २ जुलै २०२२ रोजी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांनी येऊन पहाणी केली होती. लवकरात लवकर स्थानकातील शेड, स्टेशन परिसरातील रस्ता, स्थानकातील खचलेले पेवर ब्लॉक यासंदर्भात याची कामे लवकरात लवकर होतील असे आश्वासन देण्यात आले होते.तसेच कोकण रेल्वे रत्नागिरी कार्यालयात या संदर्भात १८ जुलै २०२२ रोजी संबंधित कोकण रेल्वे अधिकार्यांबरोबर चर्चाही केली आणि स्थानकातील निवारा शेडचे काम लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निवारा शेडचे काम सुरूही होऊन शेडवरील कौले उतरवण्यात आली. परंतु आज या गोष्टीला पंधरा दिवसाचा अवधी झाला तरी अजूनही त्यात काही प्रगती झाली नसल्याचे निदर्शनात येत आहे. फलाट क्रमांक २ वरील निवारा शेडवर कौले नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच तसेच शेडवरून उतरवलेली कौले स्थानकातच ठेवण्यात आल्याने प्रवाशांना स्थानकातून गाडी पकडण्यास गैरसोय होत आहे. त्यामुळे अपघाताची होण्याची शक्यता आहे, असे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.तेव्हा संबंधित अधिकार्यांनी प्रवाशांचा निवाराच काढून घेतला आहे. कुठलाही प्रवासी हा तिकीट काढून प्रवास करतो. मग त्यांना तुम्ही सुविधा काय देता. प्रवाशांच्या जीवाचे काही बरे- वाईट झाले तर याला जबाबदार कोकण रेल्वेचे अधिकारी असतील, असे संदेश जिमन यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment