उशीद जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा कडून आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
कल्याण, (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील उशीद जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी टोपलेपाडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, या लोकोपयोगी उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले.
तालुक्यातील उशीद अरेला ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे, १२७ पट संख्या असलेल्या या शाळेत ३ शिक्षक आहेत, या शाळेच्या व्यवस्थापन समितीची नुकतीच निवडणूक झाली यामध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर गायकवाड हे निवडून आले. त्यामुळे सदस्य बबन वाघिरे, हनुमान हेगडे, अश्विनी दिपक भोईर, मुक्ता दिनेश पिंताबरे, दर्शना दत्ता देसले, सुमिधा जाधव यांच्यासह इतरही सदस्यांनी सहकार्य केल्याने ते निवडून आले.
निवडून येताच त्यांनी उशीद गावाजवळील टोपलेपाडा येथील आदिवासी विद्यार्थी कु. संतोष जाधव, सानिका धोडी, गिता टोपले, धिरज टोपले, शिवा जाधव, निशा जाधव आदी अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या वाडीत जाऊन टिफीन बॉक्स, वॉटर बॅग, वह्या आणि खाऊ आदीचे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी वाडीतील महिला व पुरुष उपस्थित होते.
याप्रसंगी आपण शाळेच्या आणि गावाच्या विकासासाठी सदैव तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, महिला मंडळ यांचे सहकार्य मिळत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जेजे आवश्यक आहे ते सर्व करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर पत्रकार संजय कांबळे यांनी सांगितले की आपण आतापर्यंत अनेक वाड्या पाड्यात मदत वाटप केली आहे, आपणांस ही जेवढे होईल तितके सहकार्य व मदत करु असे सांगितले, यावेळी भर उन्हात या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा गारवा दिसून येत होता, यापुढे आपण एक दिवस देखील शाळेत गैरहजर राहणार नाही असे वचनच या विद्यार्थ्यांनी दिले.
No comments:
Post a Comment