कवी गुलजार व जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर !!
भिवंडी (कोपर), दिं,१७,अरुण पाटील :
साल २०२३ चा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना उर्दूसाठी, तर संस्कृत विद्वान जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी जाहीर झाला आहे. अशी माहिती निवड समितीने दिली आहे.
ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, २०२३ चा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार दोन भाषांमधील प्रख्यात लेखकांना देण्यात येत आहे. यामध्ये संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक, कवी गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील समितीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी २०२२ चा ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार हा गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना जाहीर झाला होता.
गुलजार यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्यासोबतच गझल आणि कविता क्षेत्रात नाव लौकिक मिळवला आहे. गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कामांसाठी ओळखले जातात. ते या काळातील उत्कृष्ट उर्दू कवी मानले जातात. याआधी त्यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या विविध कामांसाठी त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाले आहेत.
जन्मजात अंध असलेले जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा, वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक आहेत. मध्यप्रदेशातील चित्रकूटमधील तुलसीपीठाचे ते संस्थापक आहेत. तसेच रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत.
No comments:
Post a Comment