Saturday 17 August 2024

मुख्यमंत्र्यांचा राज्यातील लाडक्या बहिणींशी मनमोकळा संवाद ! रक्षाबंधनपूर्वी बहिणींच्या बँक खात्यात ओवाळणी जमा झाल्याबद्दल 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' यांनी व्यक्त केले समाधान !!

मुख्यमंत्र्यांचा राज्यातील लाडक्या बहिणींशी मनमोकळा संवाद ! रक्षाबंधनपूर्वी बहिणींच्या बँक खात्यात ओवाळणी जमा झाल्याबद्दल 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' यांनी व्यक्त केले समाधान !!
 
पुणे दि.१५: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून जर्मन भाषेचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा शब्दात ई संवादात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील साक्षी सुरुशे यांनी लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनपूर्वीच आम्हाला ओवाळणी दिली, अशी  हृदयस्पर्शी भावना पुण्याच्या मैना कांबळे यांनी व्यक्त केली. पल्लवी हराळे यांनी शिलाई व्यवसाय वाढवता येईल असे  सांगताना मुख्यमंत्री स्वतः बोलले याचा आनंद योजनेच्या लाभपेक्षा अधिक असल्याचे सांगितले.

पुण्याच्या विधान भवन येथून या संवादासाठी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या. उमेद अभियानाने महिलांना आर्थिक उन्नतीची उमेद दिली अशा शब्दात कविता कंद यांनी शासन बचत गटांना करीत असलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

 मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक - युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पुर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता त्यामध्ये ५० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

    
 मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पुल बांधणे, दळण वळण उभारणे महत्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्वाचे आहे. यासाठी शासन कटीबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवत आहे.

 
एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम १ वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव  यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहचवल्याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

 महिलांना सक्षम  व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

 यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...