भांडुपमधील राजाराम शेठ विद्यालय व सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये "शाळा प्रवेशोत्सव दिवस" उत्साहात साजरा !!
मुंबई, (पी. डी. पाटील) : सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल. खिंडीपाडा भांडुप शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव दिवस अतिशय उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला. शाळा प्रवेशोत्सव म्हणजे केवळ स्वागत समारंभ नव्हे तर त्या विद्यार्थ्याला, पालकाला आणि शिक्षकाला एक सशक्त शैक्षणिक वातावरणात सामील करून घेण्याची सुंदर परंपरा आहे. या दिवशी मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी शिक्षणात रस, आवड निर्माण करण्यासाठी आणि शाळेविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी प्रथम प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले. या "शाळा प्रवेशोत्सव" साठी श्री. संतोष कंठे (शिक्षण उपनिरीक्षक उत्तर विभाग , चेंबूर-मुंबई) व स्थानिक आमदार अशोक पाटील ( भांडुप-पश्चिम विधानसभा ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. कंटे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी स्वतःजवळ आत्मविश्वास असणे आवश्यक असल्याचे सांगितले. आमदार अशोक पाटील यांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री रिद्धेश रमेश खानविलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. सन्माननीय आमदारांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जीवनात व्यवहारिक ज्ञान व कायद्याचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राजाराम शेठ विद्यालयाचे यश तसेच विद्यार्थ्यांचा सतत एसएससी, एलिमेंटरी, इंटरमिजिएट, शिष्यवृत्ती परीक्षेतील 100% निकाल पाहून त्यांनी शाळेचे कौतुक केले. रिद्धेश खानविलकर यांनी संस्थेची यशस्वी वाटचाल व संस्थेने यावर्षी भांडुप, मुलुंड विभागातील पहिले एलएलबी कॉलेज सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी दिली. शाळेला प्रत्येक यशासाठी संघर्ष करावा लागत असल्याची माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खानविलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे, विद्यार्थ्यांनमद्ये आत्मविश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी स्वागत गीत प्रणाली मॅडम व ज्योती मॅडम यांनी सादर केले. विद्यार्थ्याना गोड खाऊ, नैतिक कथा असणारे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. संदीप खताळ यांनी केले .अशा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment