शहरी भागा नंतर आता ग्रामीण भागात 'लव्ह मॅरेज'ची वाढती लाट ; संतुलित दृष्टिकोन आवश्यक !!
उरण दि २९. (विठ्ठल ममताबादे) :
जिल्ह्यासह ग्रामीण भागात एक मोठे सामाजिक परिवर्तन वेगाने घडताना दिसत आहे. ते म्हणजे लव्ह मॅरेजची वाढती संस्कृती. अर्थातच प्रेम विवाहचे वाढती संस्कृती.ज्या समाजात एकेकाळी प्रेमविवाह हा गुन्हा किंवा कुटुंबावरील कलंक मानला जात होता, त्याच समाजात आज तो हळूहळू स्वीकारला जाऊ लागला आहे. बदलाची गती इतकी वेगवान आहे की, अनेक गावांमध्ये गेल्या पाच वर्षांत अशा विवाहांचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढल्याचे स्थानिक जाणकार, जुने बुजुर्ग सांगतात.
या बदलामागे अनेक कारणे दिसून येतात. ग्रामीण भागातील युवक युवतींचे शहरांकडे शिक्षणासाठी स्थलांतर, कॉलेजमधील मोकळे वातावरण, तसेच मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वाढलेली संवादाची सुलभता, या सगळ्यांनी ओळखींचे जाळे विस्तारले आहे. विशेषतः मोबाईल हा या परिवर्तनाचा टर्निंग पॉइंट ठरला आहे. परिणामी, प्रेमविवाह केवळ दोन व्यक्तींचा निर्णय न राहता, ग्रामीण समाजात समता आणि स्वातंत्र्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. विविध जाती-धर्मातील तरुण एकत्र येत असल्याने सामाजिक भिंती हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र, या बदलासोबत काही गंभीर दुष्परिणामही पुढे येत आहेत. जितके फायदे तितके नुकसानहि दिसत आहेत.मोबाईलमुळे चुकीच्या नात्यांमध्ये अडकण्याचे प्रकार वाढले आहेत. अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाणे, तडकाफडकी घेतलेले विवाहाचे निर्णय, आर्थिक स्थैर्य नसताना घेतलेले निर्णय यामुळे अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत आहे. काही वेळा हे प्रकरण कोर्ट-पोलिसांपर्यंत पोहोचते, तर अनेक ठिकाणी कुटुंबांतील नाती कायमची तुटण्याची वेळ येते. काही भागांत जातीय तणाव निर्माण झाल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रेमविवाह हा केवळ विवाहपद्धतीतील बदल नसून ग्रामीण समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या मोठ्या परिवर्तनाचा संकेत मानला जात आहे. स्वातंत्र्य, समानता आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची क्षमता या मूल्यांकडे ग्रामीण पिढी झुकत असल्याचे स्पष्ट दिसते. एकूणच, ग्रामीण भागातील वाढती लव्ह मॅरेज संस्कृती ही बदलत्या काळाची निशाणी असली, तरी या बदलाला समजून घेत संतुलित दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.संतुलित दृष्टीकोण ठेवल्यास अनेक दुष्परिणाम पासून वाचता येते. त्यासाठी सर्वांनी संतुलित दृष्टीकोण ठेवणे गरजेचे आहे
No comments:
Post a Comment