5 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा: मित्रानेच केला होता घात, 4 आरोपींना अटक !!
मुंबई, (सन्नी लोंढे) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 5 वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष-7 ने यशस्वी उलगडा केला आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह फोंडा घाटात फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
कणकवली पोलीस ठाणे गु.र.नं. 39/2022, कलम 279, 304(अ), 337, 338, भा.दं.वि. सह कलम 184, 185 मोटार वाहन कायदा
2022 मध्ये कुडाळ येथील दाखल गुन्ह्यात अशपाक मुलाणी उर्फ निहाल, रा. माळशिरस, जि. सोलापूर, हा तरुण बेपत्ता झाला होता. त्यावेळी हा मोटार अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
तपासात समोर आले की, पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून मनोज नारायण भंडगे, सुरेंद्र चंद्रहास सोनावडेकर, अतिष भगवान मोरे आणि ऋतुराज शेट्टी यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यांनी निहालला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावून रात्रीच्या सुमारास जिवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह व त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली व रस्ते अपघाताचा बनाव रचला.
गुन्हे शाखा कक्ष-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींची कबुली घेतली. अटक केलेल्या चारही आरोपींना पुढील कारवाईसाठी कणकवली पोलीस ठाणे, जि. सिंधुदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त अनिल कुंभार, अपर आयुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
No comments:
Post a Comment