१९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी, ठाणे, डोंबिवली, शहाड स्थानकांचा समावेश !!
‘एम.आर.व्ही.सी,’कडून विकास आराखडा कामासाठी निविदा प्रक्रिया........
मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पश्चिम व मध्य रेल्वेवरील १९ उपनगरीय स्थानकांचा विकास करण्यात येणार होता. मात्र टाळेबंदीमुळे ही कामे रखडली आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाबाबत चर्चा होत असतानाच आता विकासकामांचा आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. स्थानकांतील प्रत्यक्षात कामाला डिसेंबर २०२१ पासून सुरुवात होईल.
या स्थानकांत मोठय़ा प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
प्रवाशांच्या तुलनेत उपनगरी स्थानकातील सुविधा अपऱ्या आहेत. अरूंद फलाट, फलाटांवरील जागा अडवणारे स्टॉल यांमुळे प्रवाशांना चालणेही कठीण होते. त्यात अपुरे पादचारी पूल, सरकते जिने, प्रसाधनगृहांची कमतरता व त्यांची स्वच्छता असे अनेक प्रश्न आहेत.
त्यामुळेच एम.आर.व्ही.सी.मार्फत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे, डोंबिवलीसह एकूण सात, हार्बरवरील चेंबूर, गोवंडीसह चार आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, कांदिवली यांसह एकूण आठ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे स्थानकांवर अनेक सुविधांची भर पडेल. प्रकल्पाबाबत गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे.
प्रकल्प राबवताना येणाऱ्या अडचणी, तसेच नेमक्या कोणत्या सुविधा द्याव्यात इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी मार्च २०२० मध्ये सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र करोनामुळे जारी झालेल्या टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया थंडावली. काही महिन्यांनी सल्लागार नेमल्यानंतर त्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. आता प्रत्येक स्थानकातील विकास कामांचा आराखडा तयार केला जाणार आहे.

No comments:
Post a Comment