Sunday, 3 July 2022

गुहागर तालुक्यातील आदर्शवत सरपंच जनार्दन आंबेकर यांचा नमन लोककला संस्थेने केला विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान !

गुहागर तालुक्यातील आदर्शवत सरपंच जनार्दन आंबेकर यांचा नमन लोककला संस्थेने केला विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान !


*( निवोशी / गुहागर - उदय दणदणे )*

 सामाजिक क्षेत्रात आणि नमन कलाकारांच्या न्याय हक्कांसाठी चाललेल्या चळवळीत उल्लेखनीय कामगिरी करत असल्या बद्दल गुहागर तालुक्यातील उमराठ गावचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांचा सोमवार दि. २७ जून २०२२ रोजी रात्री ८.३० वा. विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाटय़गृह येथे 


*रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय असलेली नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -अखंड भारत) आणि साई श्रद्धा कलापथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर नमन लोककलेचा सन्मान लोककलावंताचा या भव्य दिव्य सोहळ्यात शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.*

सरपंच जनार्दन आंबेकर हे एक हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे. शालेय विद्यार्थी दशेत असतानाच सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने सहभागी होत असत. त्याच बरोबर त्यांच्या गाजलेल्या उमराठ खुर्द आंबेकरवाडी नमन मंडळांच्या कार्यक्रमात त्यांनी वगनाट्य व प्रबोधनपर विनोदी फार्सांतून सुद्धा कामे करून नमन लोककला जपण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे. 

सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये अनेक महत्त्वाची प्रमुख पदे भुषविलेली आहेत. स्थानिक लोकोपयोगी कामे करताना अनेकदा अन्यायाविरुद्धच्या आंदोलनात सुद्धा ते प्राधान्याने पुढाकार घेत गुहागर तालुक्यातील नरवण - बोरिवली एस टी सेवा सुरू करताना बोरिवली नरवण एस.टी संघटनेचे सरचिटणीस, गुहागर तालुका लोकसेवा संघटनेचे सरचिटणीस, जनता संरक्षण कृती समिती गुहागरचे सहचिटणीस, दिपस्तंभ सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष, उमराठ खुर्द आंबेकरवाडी प्रतिष्ठानचे अनुक्रमे सरचिटणीस, कार्याध्यक्ष, अध्यक्ष, श्री दशभुज लक्ष्मी-गणेश ट्व्हल्सचे संस्थापक अशी अनेक महत्वाची पदे भुषवून सतत लोकोपयोगी कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे . 

उच्च शिक्षण घेतलेले जनार्दन आंबेकर हे इंडियन ऑइल कार्पोरेशन सारख्या नामांकित कंपनीतून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमराठ खुर्द आंबेकरवाडी या त्यांच्या मूळ गावी स्थायिक झाल्यावर उमराठच्या ग्रामस्थांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ग्रामपंचायत उमराठच्या सरपंच पदी त्यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली होती.

सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जनार्दन आंबेकर यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या वार्ड सदस्यांसह वयोवृद्धांपासून लहान-थोर ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्यासाठी वाडीभेट दौरा केला. या दौऱ्यात सूसंवादाबरोबरच भौगोलिक परिस्थितीनुसार विकास कामे, स्थानिकांच्या अडी-अडचणी, महिलांचे सक्षमीकरण, बचतगट, आरोग्य, विद्यार्थींचे शिक्षण, खेळ-क्रिडा, तलाठी कार्यालयाशी संबंधित कामे, पशू संवर्धन, आपल्या वडिलोपार्जित जागा - जमीनी न विकणे, फळबाग लागवड, स्वच्छता अभियान, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, इत्यादी बाबतीत चर्चात्मक प्रबोधन केले आहे.

 त्याचबरोबर वेळोवेळी आरोग्य, पशुवैद्यकीय शिबीरे, तलाठी कार्यालयाशी संबंधित शिबीरे, कृषी विषयक फळझाडे लागवड, नाविन्यपूर्ण प्रकल्प हळद लागवड, आधुनिक शेतीची प्रात्यक्षिके, रेशनिंग दुकानदारांसोबत चर्चा, संबंधित ग्रामिण आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा, इत्यादी उपक्रम राबविण्यात सरपंच म्हणून जनार्दन आंबेकर यांचा हातखंड आहे.

पतीच्या निधनानंतर विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्या बाबतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय ग्रामपंचायत उमराठने सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० जून २०२२ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेतला. असा धाडशी आणि ऐतिहासिक निर्णय घेणारी ग्रामपंचायत उमराठ बहुधा गुहागर तालुक्यातील पहिली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे.

असे लोकोपयोगी निर्णय घेणारी, उमराठ व उमराठ खुर्द या दोन्ही महसुली गावांतील विकास कामांना चालना देणारी, शासनाचे निर्णय, सोयी-सुविधा वेळोवेळी ग्रामस्थांपर्यंत पोहचवून सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करणारी ग्रामपंचायत उमराठ म्हणून गुहागर तालुक्यात प्रशंसा होत आहे आणि त्याचे श्रेय अर्थातच सरपंच जनार्दन आंबेकर यांना जाते. नमन लोककला संस्थेच्या वतीने लोककला विशेष गौरव पुरस्कार २०२२ श्री जनार्दन आंबेकर यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...