Friday, 2 September 2022

कल्याण तालुक्यात 'एक गाव एक गणपती', या अभिनव संकल्पनेला जवळपास जलसमाधी?मात्र अद्यापही संदप गावात राबवितात संकल्पना !

कल्याण तालुक्यात 'एक गाव एक गणपती', या अभिनव संकल्पनेला जवळपास जलसमाधी?मात्र अद्यापही संदप गावात राबवितात संकल्पना !


कल्याण, (संजय कांबळे) : एकता आणि शांतीचा संदेश देणारी एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना कल्याण तालुक्यातून नव्हे तर ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ हद्दपार होत असून एकदंर प्रत्येक तालुक्याचा विचार केला तर लवकरच या संकल्पनेला जलसमाधी मिळणार असेच वाटते.


राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच मिटावेत, शांतता प्रस्थापित व्हावी, पोलीस केस, कोर्ट कचेरीत वेळ व पैसा घालवू नये यासाठी १५ आँगस्ट २००७ मध्ये तंटामुक्त गाव ही योजना सुरू केली. अशा गावांना पुरस्कार ही जाहीर केले. यामध्ये एकता व शांतीचा संदेश देणारी एक गाव एक गणपती ही अभिनय संकल्पनेचा समावेश यामध्ये केला गेला. यामागे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वाढणारी संख्या, जागेचा तुटवडा, रस्त्यावर गणपती बसविणारे मंडळे, गल्ली बोळात, वाड्या वस्ती वर होणारे वाद, भांडणं, मिरवणूकी वरुन होणाऱ्या हाणामाऱ्या, वाहतूक कोंडी, या सर्वांचा परिणाम म्हणून अंत्यत पवित्र अश्या गणेशोत्सव सणाला लागणारे गालबोट ? 

हे सर्व टाळण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना पोलीस प्रशासन, तंटामुक्त समिती आणि महसूल विभागाच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव साजरा झाला नाही, परंतु सध्याच्या सरकारने गणेशोत्सव व इतर सणांवरील निर्बंध पुर्णपणे उठवले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असे वाटत आहे. पण यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना मागे पडत आहे.

कल्याण तालुक्यात १२४ महसुली गावे आहेत, यापैकी केवळ २ ते ३ गावातच एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये संदप गावाने ही संकल्पना प्रभावी पणे राबविली असून, वडवली, तळेपाडा, उसरघर, वेताळ पाडा आणि घारिवली इत्यादी गावांत देखील ही योजना पाळली जाते उर्वरित गावात व घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

दक्षिण महाराष्ट्रात यंदा १ हजार ८० गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागाला पुराचा फटका बसला होता त्यामुळे या परिसरातील सुमारे ६४ गावानी या उत्सवाला फाटा देऊन ही जमा झालेली रक्कम विधायक कामासाठी वापरली, हे कौतुकास्पद आहे.

आपल्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर अनेक शेतकऱ्यांचे पुरामुळे, परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे, आजही अनेक वाड्या वस्ती वर सोईसुविधा नसल्यामुळे गोरगरीब आदिवासी बांधवाचे जीव जात आहेत, दोन तीन वर्षांपूर्वी ची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही, अनेक गावात पाणी, रस्ते, आरोग्य सेवा मिळत नाही अशा वेळी आपणही अनावश्यक खर्च टाळून, गणेशोत्सवाची भाऊगर्दी कमी करून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली, तो खर्च विधायक कामासाठी दिला तर बाप्पा नक्कीच आपल्या वर प्रसन्न होईल.

त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील संदप, घारिवली, तळेपाडा, वेताळ पाडा, वडवली आदी गावातील ग्रामस्थ व त्यांच्या एक गाव एक गणपती याचे कौतुक व्हायला हवे, याबाबत पोलीस प्रशासनातील एक वरीष्ठ अधिका-यांना विचारले असता, ही संकल्पना जवळपास नष्ट झाली असे उत्तर दिले, काय म्हणावे यांना ?

 

No comments:

Post a Comment

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच... ***अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफीया ओवेस पटेल ला महापालिकेचे संरक्षण... ...