Sunday 5 March 2023

खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे कडाडले शिवसेनेची स्थापना माझ्या वडीलांनी केली, भाजपला गल्लीत कुत्रे ओळखत नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही !

खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे कडाडले शिवसेनेची स्थापना माझ्या वडीलांनी केली, भाजपला गल्लीत कुत्रे ओळखत नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही !

भिवंडी, दि.५, अरुण पाटील (कोपर) -
        शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांनी नव्हे माझ्या वडीलांनी केली आहे. शिवसेना तोडण्याचे फोडण्याचे काम जे करीत आहेत त्यांना मी सांगेल की, तुम्ही मराठी माणूस आणि हिंदुत्वावर घाव घालत आहात. हिंदुत्वाला धुमारे फुटत असताना कारस्थान करीत आहात. भाजपला गल्लीतील कुत्रे ओळखत नव्हते. ज्यांनी साथ दिली त्यांना संपवत आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
         उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात मार्गदर्शन सभा संपन्न झाली. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी आपले घणाघाती भाषण करून शिंदे गट, भाजप, किरीट सोमय्यांना लक्ष केले. ठाकरे म्हणाले, जे ढेकणं आपले रक्त पिऊन फुगली त्यांना चिरडण्याची ताकद एका बोटात आहेत. तोफेची गरजही नाही. आमच्याकडे मुलुखमैदानी तोफ आहे. संजय कदमांच्या रुपाने आपली तोफ परत आपल्याकडे आली. तोफा देशद्रोह्यां विरोधात वापरायच्या असतात.
          उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना आजपर्यंत जे - जे मिळाले ते खोक्यात बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. रिकामे आहे, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे आशिर्वाद मागायला आलो आहे. तुमची साथ हवी. जे भुरटे चोर, गद्दार आहेत त्यांना सांगतो की, नाव, शिवसेना पक्षाचे चिन्ह चोरला पण शिवसेना चोरू शकत नाही. मला निवडणूक आयोगाला सांगायचे की, तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला खेडमधील सभा पाहायला या. चुना लावणारा तो आयोग आहे.
           ठाकरे म्हणाले, मुख्यमंमत्र्यांचा अर्धा वेळ दिल्लीतच जात आहे. जागतिक पातळीवर कोरोना काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेच नाही तर सर्व लोकांचे कौतूक झाले. त्याही परिस्थितीत आपल्याकडे उद्योगधंदे येत होते. सर्व उद्योग गुजरातेत गेले. आयफोनचा कारखाना कर्नाटकात जातो महाराष्ट्राच्या हाती काय आहे.
            ठाकरे म्हणाले, एसटी महामंडळाच्या बसवर आमची जाहीरात होती की, माझा महाराष्ट्र माझे कुटुंब होय महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. पण जो कुटुंब बदलतो तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार? कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले पण आपले शेपूट घालून बसले. आमचे मविआ सरकार चांगले चालत होते पण माशी कुठे शिंकली. नितीन देशमूखांनी भर सभेत सांगितले की, कसे झोपेचे इंजेक्शन दिले. कसा छळ झाला. त्यांनी छळून लोकांना गटात ओढले. राजन साळवींच्या घरी छापा घातला.
            उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही देशद्रोही नाही तुम्ही कसे म्हणता तुम्ही बोलू शकत नाही. आ्म्ही जीभ छाटू. मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटतात. केजरीवाल माझ्याकडे आले व म्हणाले की, आपल्याला एकत्र लढायला हवे. आम्ही पंतप्रधानांना पत्राद्वारे प्रश्न विचारला. ज्यांच्या - ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरील कारवाईबाबत विचारणा केली.
            उद्धव ठाकरे म्हणाले, पोपटांना पिंजऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे. त्यांची पाप कमी आहेत का, विरोधी पक्षात असले की, गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी. आज भाजपमध्ये जास्त भ्रष्ट्राचारी आहेत. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे आता संधी साधू दिसतात.
            उद्धव ठाकरे म्हणाले, कितीही खान येऊद्या हल्ली मी त्यांना मोगॅंबो म्हणत आहे. ते आपल्याला आपसांत लढवत आहेत. जागतिक स्तरावर जो घोटाळा होत आहे त्याची चौकशी होत नाही पण सामान्यांच्या मागे लागतात. कुटुंब परिवारवादावर ते बोलतात. मी म्हणतो मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे होय आमच्या सहा पिढ्या महाराष्ट्राची सेवा करीत आहात. आमच्यावर परिवारवादाचा ठपका ठेवता तुमची वंशावळ काय?
              उद्धव ठाकरे म्हणाले, पुण्यात अमित शहा येऊन बोलले की, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटतात. तुम्ही काय चाटतात. शिवसेनेचा , मराठी माणसांचा आवाज ते संपवत आहेत. एकदिवस त्यांना देश संपवायचा आहे.
              उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? तुम्ही सांगा मी हवा की नको तुम्ही सांगा. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करायचा नाही. मी सहन करून घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवानगी घेवून शिवसेनेची स्थापना झाली नाही. न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. तुमच्या सारखे आले आणि गेले जातीलही पण शिवसेना कायम राहील.
           उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून ते आशिर्वाद यात्रा काढीत आहेत. चोरांना तुम्ही आशिर्वाद देणार. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला पण चेहरा चोरासारखा झाला. तुमच्या हातात धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण मेरा खानदान पुरा चोर है हे कपाळावर लागेल ते अजिबात या जन्मात पुसले जाणार नाही. आम्ही काय असे पाप केले, कोविडमध्ये चांगले काम केले ते पाप, कोकणाच्या विकासासाठी प्रयत्न केले ते पाप. कोकण शिवसेनेचे जीव की, प्राण आहे. शिवसेनेची सत्ता गेली पण कोकणात विजयी झालो. शिवसेना प्रमुखांनी याच मैदानात माथा टेकवला.
            उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याची काडीमात्र संबंध नाही ते गादीवर बसले म्हणून अशी देशाची परिस्थिती आहे. गोमूत्र शिंपडून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर शहीदांच्या रक्ताने स्वातंत्र्य मिळाले. गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल, प. बंगालमध्ये सुभाषबाबू आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंना चोरले. जे - जे धनुष्यबाण घेवून येत आहे ते चोर आहेत.
              ठाकरे म्हणाले, मर्दुमकी शिल्लक असेल तर धनुष्यबाण घेवून या मी मशाल घेवून येतो. महाराष्ट्र करेल तो फैसला मला मान्य आहे. मला घरी जा म्हटले मी तेव्हा वर्षा सोडले तसा घरी जाईल पण निवडणूक आयुक्त म्हणाले घरी जा तर मी त्यांना घरी पाठवेल. मी हवा की नको हे तुम्ही ठरवा.
              ठाकरे म्हणाले, ही लढाई बाकीच्या सगळ्यांना कळले की, आज आणि आत्ताच किंवा 2024 तर तेव्हाही स्वातंत्र्यलढ्याशी सुताराम संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करीत असेल तर त्या वृत्तीला येथेच गाडावे लागेल. शपथ येथे हीच घ्या की, मी माझ्या भारतमातेला यांच्या गुलामगिरीत अडकू देणार नाही. तसे जर केले तर देशाची 2024 ची शेवटची लढाई ठरेल. त्यानंतर मतदानाचा अधिकार राहणार नाही. हुकुमशाही सुरू होईल. माझ्या सभेनंतर काही बोंबलणार आहेत, काहींचा जन्म शिमग्यात झाला. धुळवड होऊ द्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारताता भगवा फडकू द्या.
             या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेशही झाला आहे. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात आज प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिवबंधन हाती बांधले.
            संजय कदम म्हणाले, शिवसेना म्हणजे आम्हीच असे गद्दार म्हणत आहेत. त्यातून ते लोकांच्या मनात संम्रभ निर्माण करीत आहेत. पण कोकणात आम्ही दाखवून देत आहोत की, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बांधील आहोत. या तालुक्यात सभा होणार असल्याने रामदास कदम अनेकांना जाण्यास मज्जाव करीत होते. कार्यकर्त्यांना ते चौकशीची भिती दाखवत होते. आमचे बॅनर फाडले गेले.
          संजय कदम म्हणाले, आम्ही शिवसैनिक म्हणून ज्या केसेस घेतल्या त्या आम्ही घेतल्या. रामदास कदम हे भित्रे आहेत त्यांच्यावर एकही केस नाही. नारायण राणेंवर ते आरोप करायचे. आता आम्ही रामदास कदमाला काय म्हणायचे. रामदास कदम कुणाचेच नाहीत. रामदास कदम जेथे राहतात तेथील सर्व पक्षाचे पदाधिकारी ठाकरे गटात आहेत. शिवसेनेचाच नगराध्यक्ष खेडमध्ये बनणार. जिल्हा परिषदही ठाकरेंच्याच शिवसेनेची सत्ता येईल.
           संजय कदम म्हणाले, भास्कर जाधव आणि मी आम्ही दोघे झोडपून काढू आणि विजय मिळवू. रामदास कदमाला वाटते की, मीच फूटीचे राजकारण केले. मी मुळचा शिवसैनिक माझ्यातील शिवसैनिक जागा झाला. शिवसेना संकटात असताना मी शिवसेनेत आलो. मला कसलीच अपेक्षा नाही.
             संजय कदम म्हणाले, रामदास कदम आजपर्यंत दुसऱ्यांची घरे फोडत होते. पण आज त्यांची तिच अवस्था होत आहे. त्यांनी उत्तर सभा घेतली पुढे काय झाले? अखंड महाराष्ट्रातील लोकांनी रामदास कदमांवर रोष व्यक्त केला. त्यांना माफी मागावी लागली. रामदास कदमांनी कुटुंब उद्धवस्त करण्याचे काम केले पण शहरात ते जावून सांगतात की, माझ्यावर वाईट वेळेवर आली.
         सुषमा अंधारेंचा सीएम शिंदेंना टोला त्या म्हणाल्या, मराठी माणसांच्या भल्यासाठी आम्ही सभा घेत आहोत. किरीट भाऊंचा गझनी झाला. ते मुळ मुद्दे सोडून कोकणातच वारंवार फिरतात. एकनाथ शिंदे नवे अदानी आणि अंबानी तयार करीत आहेत. पुढे सुषमा अंधारे म्हणाले, किरीट भाऊ डंपिंग ग्राऊंडवर इकडे तिकडे रिकाम्या बाॅटल शोधण्यापेक्षा दुसरे काम करा दुसरीकडील भ्रष्ट्राचाराकडे लक्ष द्या. एकनाथ भाऊ कसब्यात ठाकरेंनी दोनच मिनिट ऑनलाईन सभा घेतली. तर विजय झाला आता ते महाराष्ट्र दौरा करीत आहेत चाळीस आमदारांचे डिपाॅझिट जप्त होईल.

No comments:

Post a Comment

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन

प्रशांत यादव यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वा च्या पाठीशी ठामपणे उभे रहा - शरद पवार यांचे सभेतून कार्यकर्त्यांना आवाहन  ** शरद पवार यांच...