Sunday 28 May 2023

जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन !!

जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

बाळासाहेब पाटील (आय पी एस) पोलीस अधिक्षक पालघर यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियान अंतर्गत महिलांना बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी जनजागृती करण्यासाठी २७ मे २०२३ शनिवारी रोजी सकाळी ११.३० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथील सभागृहात सामाजिक बांधिलकी जपत बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह केल्याने महिलांवर होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या वेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.अनिता पाटील व पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांनी तांत्रिकदृष्ट्या बालविवाहाचे तोटे किती याची शास्त्रोक्त तसेच बालविवाह मुळे होणारे कुपोषण समस्या, सध्याची जव्हार तालुक्यातील लहान बालकांची स्थिती, महिलांचे आजार, बालविवाह प्रतिबंध कायदा, आदिवासी भागातील पारंपरिक लग्नपद्धती व त्यामुळे होणारे बालविवाह याविषयी सखोल असे आपल्या अनुभवातून आदिवासी बोली भाषेतुन महिलांना मार्गदर्शन केले, त्यानंतर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संपूर्ण जिल्हाभरात बालविवाह होऊ नये आणि लग्न समारंभात खर्च करण्याच्या दृष्टीने स्पर्धा करणे किती निरर्थक आहे याचे अनेक उदाहरणे दिली, शिवाय महिलांनी इकडचा विषय तिकडे करण्यापेक्षा बालविवाह रोखण्यासाठी असणारे कायदे व कलमांची माहिती दिली तर बालविवाह रोखण्यास मदत होईल असे बोलताना सांगितले. आपल्या मुलीचे वय वर्ष २१ झाल्याशिवाय लग्न करू नये असे ठाम पणे सांगितले.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की माता आणि सुदृढ बालक हे या देशासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही फक्त पोलिसांची नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांचीच आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात बालमृत्यू आणि कुपोषण यावर यशस्वीपणे मात करता येईल, याकरिता पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, राजकीय पुढारी, पत्रकार आणि महिला वर्ग व सुशिक्षित तरुण यांनी एकत्र येऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि ही बाब एका बंधनात बंधिस्त व्हावी याकरिता सर्वांना बालविवाह रोखण्याची शपथ दिली.

या कार्यक्रमाला खेड्यापाड्यातील आदिवासी ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्त्रियांचे आरोग्य केंद्रस्थानी ठरवीत आपणही आपापल्या गावपाड्यात बालविवाह रोखण्यास मदत करू असा निश्चय यावेळी करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी युवा उद्योजक कॅप्टन विनीत मुकणे संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य, स्त्री रोग तज्ञ डॉ.अनिता पाटील, उपजिल्हा रुग्णालय जव्हार चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक-बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, जव्हार पोलीस निरीक्षक सुधीर संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेरराव, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, विविध स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व इतर महिला भगिनी व नागरिक मोठ्या उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी देवीदास पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...