Friday, 16 May 2025

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!

मोहने गाळेगाव विभागात दोन दिवसात तीन बलात्काराच्या घटना !!

 *कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण**

संदीप शेंडगे.

*मोहने गाळेगाव, १६ मे* – मागील दोन दिवसांत मोहने गाळेगाव टिटवाळा विभागात तीन बलात्काराच्या गंभीर घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन घटना धम्मदीप नगरमध्ये तर तिसरी घटना आटाळी गावात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

कल्याण तालुक्यातील मोहने टिटवाळा गाळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी अवैध दारूचे धंदे राजरोसपणे चालविले जात हे दारूचे गुत्ते अड्डे गुन्हेगारीचे पोषण केंद्र बनत चालले असून व्यसनाधीन युवक अधिक व्यसनाधीन होत असून मुलींच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे.

मोहने गाळेगाव विभागात सर्रासपणे गावठी हातभट्टीची दारू विकली जात आहे. रस्त्याच्या कडेला आणि काही झोपड्यांमध्ये उघडपणे दारू बनवली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. मुलं रात्रीपर्यंत घराबाहेरच असतात. दारूच्या नशेत तरुण गुन्हे करण्यास मागेपुढे पाहत नाहीत असे धम्मदीपनगर मधील महिलांनी सांगितले आहे.

*चायनीज गाड्यांखाली गैरप्रकारांची रात्र*

मोहने गाळेगाव टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात चायनीज फास्टफूडच्या गाड्या रात्री बे रात्री सुरू असतात. रात्री बे रात्री कोणत्याही वेळी देशी विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्याने  येथे तरुण रात्रभर धिंगाणा घालतात. तसेच रात्रीच्या वेळेस या गाड्यांवर दारू पिणं, मारामाऱ्या, गैरकृत्ये सर्रासपणे सुरू असते संध्याकाळी सातनंतर आम्ही मुलींना घराबाहेर काढतच नाही, सांगताना आटाळी गावातील एका मुलीच्या वडिलांनी संतप्तपणे प्रतिक्रिया दिली.

**राजरोस गुत्ते, पोलीस गप्प**

राजरोसपणे देशी व विदेशी दारू विकली जात आहे. अनेक गुत्त्यांवर पूर्वी कारवाई झाली, पण काही दिवसांत तेच गुत्ते परत सुरू होतात. असा आरोप एका तरुण कार्यकर्त्याने केला.

**जनतेचा संताप – उठावाची भावना उफाळून आली**

या घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण केला आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. आज जर आम्ही आवाज उठवला नाही, तर उद्या आमच्या घरातीलच एखादी मुलगी या नराधमांच्या बळी ठरेल अशी भेदरवणारी भावना एका आईने व्यक्त केली आहे.
मुलींना जन्माला घालून आम्ही चूक केली काय असा संतप्त सवाल त्यांनी पोलीस प्रशासनाला विचारला आहे. शासन मुलींसाठी विविध योजना आणते आणि कार्यक्रम मुलींसाठी घेतात परंतु जर मुली सुरक्षित नसतील तर या कार्यक्रमांना या योजनेला काय अर्थ उरतो असे एका आईने सांगितले.

*शासनाकडून ठोस पावलं उचलणे अपेक्षित*

या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे .

विशेष मोहीम राबवून मोहणे अटाळी, गाळेगाव, बल्यानी आदी परिसरातील सर्व दारूचे मटक्याचे अड्डे उध्वस्त करून टाकले पाहिजेत. असे अड्डे चालविणाऱ्यांची तडीपरीची कारवाई केली पाहिजे रात्री गस्त वाढवणे, अवैध गुत्त्यांवर कायमस्वरूपी बंदी, आणि महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके स्थापन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटेल आणि कायदा हातात घेण्याची वेळ येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

तरी महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन काय निर्णय घेते काय कारवाई करते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !!

समाजसेवक दत्तात्रय होरंबे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निवोशीत वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम !! [ निवोशी | गुहागर : उदय दणदणे ...