उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करा !!
अशोक दामू भोईर / न्हावा रायगड
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण नेरुळ तसेच उरण - बेलापूर लोकल सेवा दिनांक १२ जानेवारी २०२४ उरणकरांच्या मागणीनुसार सुरू झाली. उरण नेरुळ व उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवी मुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला उरण चा औद्योगिक विकास झाल्याने नोकरवर्ग, विद्यार्थी, व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. रेल्वे सेवा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा प्रवास अति जलद झाला.प्रवासी संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी-न्हावा शेवा सागरी पूल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो इत्यादी साठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो. नेरूळ - बेलापूर - उरण रेल्वे मार्ग पुर्ण झाले आहे. मात्र दर एका तासाने रेल्वे असल्याने हा रेल्वेमार्ग लोकल न वाटता शटल सारखी वाटते.
लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने उरणकरांची परवड होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या एक तासाऐवजी प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी, तसेच उरण सीएसटी लोकल उरण ठाणे लोकल ताबडतोब चालू करण्यात यावी व बेलापूर ते उरण रस्त्यावरील मालवाहतूक हा सगळा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी हजारो प्रवासांच्या हितासाठी सरकारने व रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील प्रवाशी करत आहे. आणि ते बरोबर पण आहे.कारण हजारो महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नोकरवर्ग या लोकलने प्रवास करत आहेत, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, संबंधित रेल्वे विभाग, रेल्वे मंत्रालय यांनी या विषयाची दखल घेऊन ताबडतोब निर्णय घ्यावा.
उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला असावी याला कारण उरण, बामन डोंगरी, खारकोपर एकंदर सर्वच स्टेशन वरील प्रवाशांची वाढती संख्या आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब, चाकरमानी मुंबई नवी मुंबई येथे घर घेऊ शकत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी सरकार आणि बिल्डरने जाहीर केले होते लोकलसेवा प्रवाशांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या जातील मात्र आजवर तसं झाले नाही.
कामाला जाणे-येणे सोयीचे व्हावे म्हणून बहुतेक नोकरवर्गाने आपली कमाई, कर्ज काढून उरण नेरुळ मधील विकसित होणाऱ्या वेगवेगळ्या नोडमध्ये घरे घेतली आहेत, परंतु उरण नेरूळ किंवा सीबीडी बेलापूर या प्रत्येक तासाला असणाऱ्या लोकलच्या फेऱ्या ह्या सर्वसामान्यांच्या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत त्रासदायक ठरत आहेत याशिवाय लोकलचे टायमिंग सकाळी पाच वाजल्यापासून किंवा रात्री उशिरा साडेदहा नंतर नसल्यामुळे कामगार वर्गासाठी खूप गैरसोयीचे होत आहे. सेकंड शिप किंवा उशिरा कामावरून उशीर झाल्यास प्रवाशाला त्रास सहन करावा लागत आहे.म्हणून उरण नेरूळ किंवा उरण बेलापूर लोकल प्रत्येक पंधरा मिनिटाला सुरु करून प्रवाशांना त्रासमुक्त करावे.
सौजन्य -
शांताराम गुडेकर (जेष्ठ पत्रकार)
No comments:
Post a Comment