मुंबईतील मृत्यूनंतर उरण मध्ये कलिंगड विक्रीला फटका ; उरण मधील बाजारावर परिणाम !!
** व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती.
उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : बिर्याणी खाल्या नंतर लगेचच कलिंगड खाल्याने
मुंबईत एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कलिंगडाबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून उरण मधील बाजारातील मागणीवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. संबंधित प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी असतानाच कलिंगड खरेदी बाबत नागरिक सावध झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.उन्हाळ्यात कलिंगडला मोठी मागणी असते. त्यामुळे उरण मधील बाजारात दररोज विविध ठिकाणाहून कलिंगडाची आवक होत आहे.
घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की बाजारात कलिंगड दहा ते पंधरा रुपये किलो दराने विकले जात आहे. तर किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये किलो दराने विक्री होत असून एक कलिंगड साधारण ४० ते ८० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.मात्र मंगळवारपासून किरकोळ बाजारात कलिंगडची विक्री कमी झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ग्राहक खरेदीपूर्वी फळ तपासून घेत आहेत. काही ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलल्याचे चित्र दिसत आहे. 'कलिंगड सुरक्षित आहे ना?', 'हे खाल्ल्यावर काही त्रास होणार नाही ना?' 'असे प्रश्न ग्राहकांकडून विचारले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितलें.दरवर्षीच्या तुलनेत यंदा कलिंगडाचे उत्पादन आणि आवक आधीच कमी असल्याचे व्यापारी सांगतात. त्यातच मागणी घटल्याने व्यापारावर परिणाम होऊ लागला असून नुकसानाची चिंता वाढली आहे.मुंबई मधील घटनेचा परिणाम उरण मधील कलिंगड व्यापारी, विक्रेता वर झालेला दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही घटनेचे कारण तपास अहवालाशिवाय ठाम सांगता येत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे
No comments:
Post a Comment