राज्यात पावसाचे पुनरागमन; ठाणे, पालघर, कोकणात यलो अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा !!
*मुंबई, प्रतिनिधी*
काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मुंबई व नवी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. विदर्भही या पावसाला अपवाद ठरला नाही. आठवड्याच्या अखेरीस पुढील 24 तासांत मोसमी वाऱ्यांची दिशा आणखी पुढे सरकणार असून, वाऱ्यांना मिळालेल्या वेगामुळे राज्याच्या उर्वरित भागांतही पाऊस सक्रिय होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
*सरींचा अंदाज*
पहाटेच्या वेळी व दिवस मावळल्यानंतर पावसाचे ढग दाटून येऊन अनेक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर सरींचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
*यलो अलर्ट व वाऱ्याचा वेग*
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
*घाटमाथ्यावर खबरदारी*
उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील घाटमाथ्यावर दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादरम्यान प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.
*तापमानात फारसा फरक नाही*
राज्याच्या काही भागांत पाऊस सक्रिय झाला असला तरी काही भागांमध्ये त्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे तूर्तास तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. येत्या दिवसांत हा पाऊस किती मनसोक्त बरसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment