अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!
*मुंबई, संदीप शेंडगे* : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मुंबईतील आझाद मैदान येथे सोमवारी भव्य 'विराट मोर्चा' काढण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.
*आनंदराज आंबेडकर, अशोक आंबेडकर यांचे नेतृत्व*
या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि अशोक आंबेडकर यांनी केले. उपवर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल व संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
*घोषणांनी दणाणले आझाद मैदान*
मोर्चादरम्यान "संविधान बचाव", "अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा", "सामाजिक न्याय अबाधित ठेवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र व राज्य शासनाने आरक्षण व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
*शासनाला निवेदन*
मोर्चानंतर शासन प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना कायम ठेवावी आणि समाजात फूट पाडणारे निर्णय तातडीने थांबवावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
*राज्यभरातून भीमसैनिकांची उपस्थिती*
बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, अमरावती अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक सहभागी झाले होते. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात पंचशील ध्वज, निळा ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या.
शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे आझाद मैदान परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आंबेडकरी समाजातील विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
No comments:
Post a Comment