कल्याणमध्ये विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात चार विद्यार्थी जखमी !!
कल्याण : संदीप शेंडगे
कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील मार्टिन चौक येथे गुरुवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रिक्षा कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन नॅशनल उर्दू शाळेकडे जात होती. रिक्षामध्ये चालकासह सहा विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळच्या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना समोरून भरधाव वेगाने येणारी बस पाहून रिक्षाचालकाचा क्षणभर ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्यावर उलटली.
या अपघातात चार विद्यार्थ्यांना दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शालेय रिक्षांची नियमित तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment