डायसाण फाउंडेशनच्या कार्याचा राज्यस्तरावर गौरव; 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' प्रदान
मुंबई | प्रतिनिधी
समाजसेवा, रक्तदान जनजागृती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या डायसाण फाउंडेशन (NGO) च्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, संस्थेचे डॉ. अतुल तारासिंग राठोड आणि सौ. वैशाली अतुल राठोड यांना 'छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार – २०२६' या मानाच्या पुरस्काराने मुंबईतील मालाड येथे येथे पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गौरविण्यात आले.
अर्हितांगण रक्त सारथी संस्थान, जालोर (राजस्थान) यांच्या वतीने आयोजित या भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून सामाजिक कार्यकर्ते, रक्तदाते, पत्रकार, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या डायसाण फाउंडेशनने अल्पावधीतच समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये २५ हून अधिक भव्य रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करून हजारो नागरिकांना लाभ मिळवून देण्यात संस्थेने मोलाची भूमिका बजावली आहे. रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठीही फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.
याशिवाय बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आदिवासी शाळांच्या दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, 'क्लीन येऊर – ग्रीन येऊर' या पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान, सामाजिक आरोग्य जनजागृती, गरजू कुटुंबांना विविध प्रकारची मदत तसेच "Pay Back to Society" या संकल्पनेतून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून डायसाण फाउंडेशनने समाजात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अतुल तारासिंग राठोड यांनी सांगितले की, "हा सन्मान केवळ माझा आणि माझ्या पत्नीचा नसून डायसाण फाउंडेशनशी जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवक, रक्तदाता, सामाजिक कार्यकर्ता, देणगीदार, कॉर्पोरेट सहकारी आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. हा पुरस्कार आम्हाला अधिक जबाबदारीने आणि अधिक व्यापक स्वरूपात समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे."
सौ. वैशाली अतुल राठोड यांनीही हा सन्मान समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला समर्पित करत, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यास कैलाशजी जैन, कु. पियू चव्हाण, अभयकुमार तेलगुडे (श्रीरामपूर), माधव सुभाष पुर्णीकर (नांदेड), अभी बले (पांढरकवडा), श्रीकृष्ण कुमार (मूर्तीजापूर) यांच्यासह विविध राज्यांतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते.
डायसाण फाउंडेशनला मिळालेला हा सन्मान संस्थेच्या सातत्यपूर्ण, निःस्वार्थ आणि समाजकेंद्रित कार्याची अधिकृत दखल मानली जात असून, भविष्यातही शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजगारनिर्मिती आणि समाजसेवा या क्षेत्रात अधिक व्यापक प्रमाणात कार्य करण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी अशा उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment