Wednesday, 1 July 2026

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

आधुनिक शिक्षण आणि शिक्षणाचे आधुनिकीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती !!

उरण, (विठ्ठल ममताबादे ) : भारतामध्ये डिजिटल उत्क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात ‘डिजिटल भारत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल साक्षरतेवर भर देण्यात आला. त्यानंतर ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ च्या माध्यमातून शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले. मागील तीन दशकांमध्ये शैक्षणिक परिसंस्थेमध्ये अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच स्थानिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदींमुळे शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. मात्र शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अपेक्षित वाढ अजूनही झालेली नाही. या बदलांमध्ये ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी स्तरावर तफावत स्पष्टपणे जाणवते.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतीची गरज असल्याचे मत शिक्षण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश ठाकूर यांनी व्यक्त केले.सध्याच्या शिक्षणामध्ये दोन महत्त्वाचे टप्पे दिसतात: शिक्षणाचे आधुनिकीकरण – पारंपरिक पद्धतींमध्ये सुधारणा करून डिजिटल साधनांचा वापर, आधुनिक शिक्षणाचा समावेश – पायाभूत साक्षरतेसोबत तंत्रज्ञान, नीतीमूल्ये, कौशल्ये आणि सर्जनशीलतेवर भर. या प्रक्रियेत शिक्षक आणि मानवी भूमिका महत्वाची ठरते. आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कौशल्यप्राप्त मनुष्यबळ आवश्यक आहे. 

सुरुवातीला संगणकीय शिक्षण म्हणजे आधुनिक शिक्षण मानले जात होते. मात्र कालांतराने नियमित विषयांच्या अध्यापनामध्ये डिजिटल पद्धतींचा वापर होऊ लागला. डिजिटल अभ्यासक्रमामुळे क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. ही पद्धती विद्यार्थ्यांना रुचली असली तरी शिक्षक किंवा पर्यवेक्षण स्तरावरील मनुष्यबळाकडून अजून पूर्णपणे स्वीकारली गेलेली नाही. काही प्रमाणात भीती तर काही प्रमाणात गरज नसल्याची भावना दिसून येते. शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेईल ही बाब अशक्यप्राय आहे. मात्र विकसित तंत्रज्ञानाचा स्वीकार न केल्यास पुढील शैक्षणिक परिसंस्थेतून असे मनुष्यबळ मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षकांनी आपल्या कौशल्यांमध्ये डिजिटल संसाधने वापरण्याचे तंत्र कमी अवधीत आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. तुलनात्मक बोलताना आपण विकसित देशांमधील शिक्षणप्रणालीची उदाहरणे देतो, मात्र ती प्रणाली आपल्या देशात राबवण्यासाठी आवश्यक तयारी करताना मात्र कारणे दिली जातात. ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. डिजिटल संसाधने आणि एआय तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा शिक्षकांकडून प्रभावी व संतुलित वापर झाल्यास पुढच्या टप्प्यात अशा तंत्रज्ञानाच्या विकासासंदर्भातील शिक्षणाचा समावेश करणे शक्य होईल. 

आधुनिक शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारीला चालना देणारे माध्यम बनले आहे. शिक्षणाचे आधुनिकीकरण हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे, आणि शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून या बदलाला गती देणे ही काळाची गरज आहे असे मत निलेश बाळकृष्ण ठाकूर (समन्वयक-EdTech कार्यक्रम, प्रथम इन्फोटेक फाउंडेशन) यांनी व्यक्त केले आहे. निलेश ठाकूर हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील विविध विषयावर ते नेहमी जनजागृती करीत असतात

No comments:

Post a Comment

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे

*बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला नाही तर कोकणभूमी नरकभूमी होईल – संजय कोकरे *कोकण, बातमीदार : स्वतंत्र कोकण राज्य अभियाना...