एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ !!
*# ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी थेट जमिनीवर बसून केला निषेध
कल्याण, संदीप शेंडगे : सोमवारी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट यांनी एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याने सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राहुल कोट यांनी विचारलेल्या प्रश्नावर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप राहुल कोट यांनी केला.
तसेच गोरगरिबांच्या शंभर रुपये घरपट्टी बाकी असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते परंतु कोट्यावधी रुपयाची थकबाकी असून या बड्या उद्योगपतींना महापालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप कोट यांनी केला आहे.
गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये एकही लोकप्रतिनिधी नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर राहुल कोट यांनी संताप व्यक्त करत सभागृहातच जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्यासह इतर नगरसेवकही जमिनीवर बसून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर हर्षाली चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनी मध्यस्थी करत समितीचा अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर राहुल कोट व इतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी शिवसेनेचे उमेश बोरगावकर यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक एनआरसीचा प्रश्न वारंवार उपस्थित करावा लागत असल्याची टीका केली. तसेच, एनआरसीची थकबाकी नेमकी कधी वसूल होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
No comments:
Post a Comment