श्रमजीवी संघटनेच्या शहीद जागर अभियान व चेक वटवा मोहीमेला सुरूवात !
"नऊ ऑगस्ट पर्यंत चालणार मोहीम"
टिटवाळा, उमेश जाधव -: संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांचा लाभ आज तागायत आदिवासी बांधवांना पूर्ण पणे मिळालेला नाही. वारंवार राजकीय व शासनदरबारी दाद मागू, लढा, आंदोलन व उपोषणे करून देखील मिळाला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवू ७४ वर्षे झाली. तरीपण आदिवासी बांधव मुलभूत अधिकारापासून वंचितच आहेत. याच करीता १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट पर्यंत श्रमजीवी संघटनेच्या शहीद जागर अभियान व चेक वटवा मोहीमेला रवीवारी गोवेली येथून सुरूवात करण्यात आली.
आज पर्यंत आदिवासी बांधवांना घरकुल, घरा खाली जागा, वन जमीन, जातीचा दाखला, गावठाण विस्तार, आधार कार्ड, रेशन कार्ड, रोजगार आणि शिक्षण या संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा लाभ हवा तसा मिळालेला नाही. याचा लाभ आदिवासींना भारतीय स्वतंत्र्याच्या ७५ दिना नंतर तरी मिळावा याकरिता ठाणे, पालघर, रायगड व नाशिक या चार जिल्ह्यांतून श्रमजीवी संघटनेच्या वतीने शहीद जागर अभियान व चेक वटवा मोहीमेला रविवारी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातून गोवेली येथून सुरूवात करण्यात आली. या मोहिमेला गोवेली मंडळ अधिकारी संजय साळुंखे व शिवसैनिक चंद्रकांत गायकर यांनी संघटनेचा ध्वज दाखवू सुरूवात केली. या मोहिमेत वीस दुचाकी, एक रिक्षासह साठ आदिवासी महिला व पुरुष सहभागी झाले आहेत. कल्याण तालुक्यातील संपूर्ण गावातून ही रॅली फिरवून ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी या मोहिमेची सांगता करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने व तालुका अध्यक्ष विष्णू वाघे यांनी केले आहे. तसेचे संटनेच्या संघटक गीता फसाळे, वासुदेव वाघे, किरण सुर्यवंशी, श्रीपत जाधव, महेंद्र जाधव सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.



No comments:
Post a Comment