कांबा येथील खदान बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ !!
"लीज धारकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान"..!
*पठारपाड्यातील रहिवाशांनी कांबा येथील खदान पाडल्या बंद*..
कल्याण, संदीप शेंडगे -: कल्याण तालुक्यातील कांबा गावातील दगडी खदाननींचे काम गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेकडो कामगार हवालदिल झाले असून काम कधी सुरू होईल याच्या प्रतीक्षेत आहेत.
कायदा हातात घेऊन पठारपाड्यातील रहीवाशी वरून दगडफेक करून काम बंद करत आहेत. या खदानीमुळे आमच्या घरांना हादरे बसुन तडे जातात अशा प्रकारचा आरोप पठारपाड्यातील रहिवाशांनी केला आहे.
कांबा गावाच्या हद्दीत डोंगराजवळ कांबा गावातील स्थानिक भूमिपुत्र व रहिवासी दगडी खदानीवर काम करून आपली उपजीविका चालविण्याचे काम करतात. या ठिकाणी सात क्रेशर मशीन आहेत. छोटे-मोठे मशीन वापरून दगड फोडण्याचे काम येथे सुरू असते. फोडलेला दगड घरांच्या बांधकामासाठी तसेच दगडा पासून खडी तयार करून ही खडी रस्ता व बांधकामासाठी वापरली जाते यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील ७०० ते ८०० कुटुंब अवलंबून आहेत. परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून पठारपाडा वस्तीतील नागरिकांनी बेकायदेशीरपणे कायदा हातात घेऊन येथील खदानींचे काम बंद केले असून कामगारांना दगड फोडण्यासाठी विरोध दर्शविला आहे. पाठारपाडा येथील नागरीक खदान चालकांना व कामगारांना दमदाटी करीत असून खदान काम बंद करन्याकरीता पठारावरून दगडफेक करतात. या दगडफेकीत काही कामगार जखमी झाले आहेत. पठार पाडा येथील नागरिकांच्या मनमानी व दडपशाहीमुळे येथील शेकडो कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ज्या ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी शासनाकडून रॉयल्टी भरून रीतसर खदान चालविण्यास परवाने घेतले आहेत. अशा व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. पठार पाडा येथील रहिवासी कोणत्याही प्रकारचे काम करू देत नसल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. आम्ही शासनाकडे कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी भरणा केला असून काही आडमुठ्या रहिवाशांचा कामाला विरोध असल्याने शासनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी कांबा गावातील शेकडो ग्रामस्थांनी व खदान चालकांनी शासनाकडे केली आहे.
पठार पाडा येथील ग्रामस्थांना काम बंद करण्याचे कारण विचारले असता खदानच्यावर पठार पाड्यावर आमची घरे आहेत. खदान मालक हे रात्री बेरात्री पहाटे डोंगरातील दगड फोडण्यासाठी बारूद लावून ब्लास्ट करीत आहेत. मोठा आवाज होऊन जमीन हादरत आहे त्यामुळे आमच्या घरांना तडे जात आहेत. तसेच आमच्या पिण्याच्या पाण्यावर परिणाम झाला असून विहिरीचे पाणी आटले आहे. आमच्या घरांना नुकसान होत असल्याने या खदानी बंद कराव्यात म्हणून आम्ही शासनाकडे निवेदन दिले आहे, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
घरांना नुकसान होऊ नये म्हणून पठार पड्यावरील नागरिकांच्या सहमतीने खदान मालकांनी स्वखर्चाने २०१८ ला चांगली घरे बांधून दिली आहेत. परंतु ते या घरांमध्ये राहावयास जात नसून केवळ त्रास देण्याच्या उद्देशातून खदानींचे काम बंद करत आहेत. आम्ही पठार पाडा रहिवाशांच्या सर्व मागण्या पूर्ण करावयास तयार असून त्यांनी चर्चेने प्रश्न सोडविण्यास तयार व्हावे - राजेश बनकरी, कांबा ग्रामस्थ पोलीस प्रशासनाने व शासनाने आमच्यावर होत असलेल्या अन्याय तातडीने दूर करावा गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले काम सुरू करून द्यावे. कामगारांची उपासमार थांबवावी अशा मागण्यांचे निवेदन येथील खदान मालकांनी प्रांताधिकार्यांना व शासनाला दिले आहे.
त्यामुळे शासनाने मध्यस्थी करून पठार पाडा येथील नागरिकांची समजूत घालून नऊ महिन्यांपासून बंद असलेली खदान सुरू करून सातशे ते आठशे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा - छगन बनकरी, कांबा ग्रामस्थ
आम्ही शासनाला रितसर महसूल भरला असुन, पठारपाड्यातील रहीवाशी कायदा हातात घेऊन दगडफेक करून आमचे काम बंद करत आहेत. आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने आम्हाला न्याय दावे - मुरली वलेचा, खदान मालक
शासन प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते की नाही. उपासमार सुरू असलेल्या कामगारांना न्याय मिळतो की नाही. याकडे संपूर्ण कल्याण तालुक्यासह सोलापूर कामगारांचे लक्ष लागले आहे.
पठारपाड्या लगत असलेली शासकीय जमिन आपण लिलाव करून खदान मालकांना लिजवर दिल्या आहेत. खदानींच्या स्फोटामुळे तडे जातात अशी त्यांची तक्रार आहे. मी पहाणी करून आलो आहे. आदिवासी बांधवांचे व खानमाकांचेही नुकसान होणार नाही यासाठीचा प्रस्ताव मी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. तसेच आदिवासीं बांधवांनी मागणी केली तर त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यात येईल. "अभिजित भांडे पाटील, प्रांताधिकारी" कल्याण यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

No comments:
Post a Comment