Thursday, 27 October 2022

📖✍️ मी गुरुजी बोलतोय... (८)

📖✍️ मी गुरुजी बोलतोय.... (८)


   *कुणबी राजकीय संघटन समितीसह सर्व कुणबी बांधवाना मनापासून शुभेच्छा !* (मागील पानावरून, प्रशासकीय कार्याचा आढावा घेता घेता, थोडसं वळूया वास्तवतेकडे.)
       *खुराड्यात असलेल्या ८५ टक्के कोंबड्यांना झुंजवत ठेवून कितीतरी कोंबड्या सत्ताधाऱ्यांनी आधीच फस्त केल्या आहेत.* एकमेकांना चोच मारुन, अजूनही काही कोंबड्या झुंजताहेत. 
       ऐन निवडणुकीच्या काळात आपल्याच खुराड्यातल्या कोंबड्याना, मानसिक दृष्ट्या जायबंदी करुन आनंद व्यक्त करणारी ही एक जमातच म्हणावी लागेल. *हे वास्तव विकल्या गेलेल्या संबधित वर्गाला चांगले ठाऊक आहे ! त्यावेळचे "स्नेहभोजन" कशासाठी हे असते ? याची पूर्ण कल्पना यांना असते ?* पण आपल्याच भाऊबंदांना झुंजत ठेवून स्वतःची सोय करायची इतकंच त्यांना ठाऊक असतं ! 

        अखेर मस्त ढेकर देत आमच्यातल्याच काहींनी मतलबींचा उदो उदो करीत, आपल्याच घराचे तुकडे करून, *आपलं घरच, सातबार्‍यांसह त्यांच्या ताब्यात दिलंय.* उतार्‍यावरील हकदार वारसदारांना हे कुणी केलं, कसं केलं याची खबर सुध्दा नाही. अजूनही आम्हाला कळत नाहीय की, *पुढचा नंबर कदाचित आपलाही असेल. आपल्या पिल्लांचाही नंबर असेल !* आज प्रत्येक बांधवापुढे एक आव्हान आहे. उध्वस्त झालेला आपला सातबारा, कार्यालयीन कामासाठी आधी मनाने एक करायला हवा ! याकडे डोळेझाक करून तर चालणार नाहीच, *पुढ्यात पडलेले दाणे टिपण्यात, ज्यांना समाधान आज वाटतंय. ते आतापुरतं त्यांच पोट भरताहेत ! पण आपल्या पिढीचं काय ?*

       *परंतु एव्हाना खुराडेच्या खुराडे उध्वस्त करुन बहीरी ससाणे, गिधाडे वेस ओलांडून आपल्या गावात अगदी वाडीवाडीत जमा झाल्येत.* आणि आम्ही, अजूनही *भावकी - गावकीत* झुंजतोय. *फक्त निरर्थक झुंजतोय !*
 
     *आपला शत्रू कोण ?* हे न ओळखता, खऱ्या शत्रुवर तुटून पडण्याचे भान, आम्ही विसरून गेलोय. नव्हे हेतुपुरस्कर विसरलोय ! *कारण आम्ही स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी विभक्त झालोय !* आणि अश्याही अवस्थेत रुढी-परंपरेच्या बहाण्याने वैदीक विचारानेही पछाडले गेलोय. अजूनही वाटतं आम्हाला *आमचा हितकारक राजा परत यावा !* म्हणून पाताळात गाडलेल्या, आमच्या राजाची कित्येक वर्षे आम्ही फक्त वाट पहातोय, पण *दिवाळीच्या बलिप्रतिपदेलाच, दिवाळसण मात्र आनंदाने साजरा करीत फक्त आणि फक्त म्हणतोय!* 
        *ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो।* 
        *ईडा पिडा टळो बळीचे राज्य येवो।*
     *पण आजच्या सर्रास चाललेल्या राजकारणात आपला राजा आहेच कुठे ? इथे आपल्या मताला किंमत शून्य आहे.* 

     खरे तर, *दुधाने तोंड भाजलंय, ताक फुंकून पिण्याची गरज आहे.* काळाप्रमाणे नवी बांधणी करायलाच हवी ! *पण कोणतही संघटन मजबूत करायचं असेल तर सखोल अभ्यास हा हवाच !* 
                           शाहीर वसंत भातडे 
                        *मो. ९९६७९८३३०२*

No comments:

Post a Comment

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !!

मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न !! नवीन पनवेल/केतन भोज मोहटा...