आदि महोत्सवाची यशस्वी सांगता "महाराष्ट्राच्या आदिवासी दालनांना" उत्तम प्रतिसाद !
नवी दिल्ली, 28 : राजधानी दिल्लीत आदिवासी मंत्रालयाकडून आदि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी या महोत्सवाची यशस्वी सांगता झाली असून याठीकाणी असणाऱ्या राज्यातील आदिवासी दालनांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
येथील ध्यानचंद स्टेडियम येथे आदि महोत्सवाचे उद्घाटन 16 फेब्रुवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. तर, समापन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थित झाले. यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा, ट्रॅायफेडचे अध्यक्ष रामसिंह राठवा उपस्थित होते.
राज्याच्यावतीने याठिकाणी दालने उभारली होती. यातंर्गत तीन वारली चित्रकांराची दालने, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची दोन दालने, आदिवासी समाज जीवनातील खाद्य पदार्थांचे दालन, एक आदिवासी शेतकरी उत्पादित कपंनीच्या वस्तुंचे दालन आणि आणखी एक ऑरगानिक वस्तुंच्या उत्पादनाची स्टॉलही होता. या दालनांना राजधानीतील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया स्टॉलधारकांनी दिली.
राज्याच्या दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भेट दिली होती. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी ही भेट दिली. पद्श्री पुरस्कार प्राप्त रजनीश यांनी भेट देऊन प्रमाणपत्र स्टॉल धारकांना वितरीत केले.
आदि महोत्सवामुळे आदिवासी कारगीरांना लाभ झाल्या असल्याचे केंद्रीय आदिवासी मंत्री श्री मुंडा सांगता सोहळयात म्हणाले. तीन कोटी पेक्षा अधिक आर्थिक व्यवहार या महोत्सवात झाला असल्याचे श्री मुंडा यांनी सांगितले. याप्रसंगी सहभागी लाभार्थींना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले.
200 पेक्षा अधिक दालने या महोत्सवात होती. यातंर्गत आदिवासी समाजातील समृद्धता आणि सांस्कृतिक पंरपरेचे दर्शन घडविले गेले. हे वर्ष अंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष (भरडधान्य/ श्री अन्न) म्हणुन साजरे केले जात असल्यामुळे येथे आदिवासी समाजात रोजच्या जेवणात वापरण्यात येणारे भरड धान्याचे दालन विशेष आकर्षणाचे ठरले. यासोबत हस्तकला, हातमाग, मातीची भांडे, दागदागिने, अलंकार, सजावटीच्या वस्तू इत्यादी आदि महोत्सवाचे आकर्षण होते.
No comments:
Post a Comment