टाकळी अमिया वस्ती रस्त्याविना अडचणीत – ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी !!
टाकळी अमिया (ता. आष्टी, जि. बीड) – प्रतिनिधी
टाकळी अमिया गावातील शेत वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आजारी लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. अवकाळी पावसामुळे साऱ्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, जीवनावश्यक सेवा, तसेच रुग्णवाहिका देखील या भागात पोहोचू शकत नाही.
वेशीपासून वस्तीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः निष्क्रिय होतो. अशा अवस्थेत ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून वस्तीपर्यंत प्रवास करावा लागतो. परिणामी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, मौजे गावातील सर्व वस्ती ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून पक्के रस्ते बांधावेत. तसेच गरोदर महिलांसाठी तातडीची रुग्णसेवा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ग्रामीण भागांमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव ही मोठी समस्या असून, आरोग्यसेवा आणि वाहतूक व्यवस्था सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
ग्रामस्थ : गणेश ससाणे +919850495688
No comments:
Post a Comment