महाराष्ट्रात पुढील 72 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; कल्याण-डोंबिवलीतही जोरदार सरींची शक्यता !!
*मुंबई, प्रतिनिधी* : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील 72 तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सक्रिय झालेल्या दोन चक्रीवादळसदृश स्थितींमुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*कुठे पडणार जोरदार पाऊस?*
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडेल. यावेळी ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे आणि झाडे किंवा फांद्या कोसळण्याच्या घटना घडू शकतात.
*दुहेरी हवामान प्रणाली सक्रिय*
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि उत्तर छत्तीसगड परिसरात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
या दोन हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
*नागरिकांना सूचना*
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे, झाडांखाली आणि जुन्या इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment