सानपाडा परिसरात झाड अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार महिला जखमी !
उद्यान विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह ; मनसे आक्रमक
नवी मुंबई, प्रतिनिधी
पावसाळ्यापूर्वी वृक्षांची तपासणीसाठी वृक्षतज्ज्ञांच्या नियुक्तीसह रेझिस्टोग्राफ यंत्राद्वारे अंतर्गत मजबुतीची चाचणी बंधनकारक असतानाही मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आज मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी कामात निष्काळजीपणा दाखविल्याबाबत उद्यान विभागातील अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर तातडीने कठोर तसेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
यासंदर्भात मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्तांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांचे निवेदन स्वीकारले.
पावसाळ्यापूर्वी नवी मुंबई शहरातील ७ हजारांहून अधिक झाडांच्या शास्त्रीय छाटणीचा आणि धोकादायक झाडे हटविण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरत आहे. नवी मुंबईत अवघ्या १२ दिवसांत ३३४ वृक्ष कोसळल्याने महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी २४ तासांत शहरात ९१ वृक्ष कोसळले, तर सोमवारी सकाळी ८:३० वाजता ते सायंकाळी ५:३० वाजता या अवघ्या ९ तासांच्या कालावधीत आणखी ६२ झाडे आणि काही मोठ्या फांद्या कोसळल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. त्यातच सानपाडा परिसरात सलग घडत असलेल्या दुर्घटनांमुळे महापालिकेच्या वृक्ष छाटणी मोहिमेच्या परिणामकारकतेवर आणि पावसाळापूर्व कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
सानपाडा परिसरात झाडे कोसळल्याने सेक्टर २, ३, ४, ५, ६, ८ आणि ९ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली, वाहनांचे नुकसान झाले. वेस्टर्न कॉलेज बाहेर गुरुद्वारा समोर एका दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर सोमवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याने सदर महिला जखमी झाल्याची घटना घडली. अश्या दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी पत्रात म्हटले आहे.
पावसाळ्यातील वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच वृक्ष व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक ठेकेदाराने पात्र वृक्षतज्ज्ञ
नियुक्त करणे आणि रेझिस्टोग्राफ यंत्राद्वारे वृक्षांची तपासणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वी वृक्षांची तपासणीसाठी वृक्षतज्ज्ञांच्या नियुक्तीसह रेझिस्टोग्राफ यंत्राद्वारे अंतर्गत मजबुतीची चाचणी बंधनकारक असतानाही मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडत असल्याने या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाली का, वृक्षतज्ज्ञांची नियुक्ती झाली होती का, रेझिस्टोग्राफचा प्रत्यक्ष वापर केला होता का, तसेच संबंधित ठेकेदार आणि विभागीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली का, याची चौकशी करून कामांत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कामचुकार संबंधित ठेकेदार आणि विभागीय अधिकारी यांच्यावर कठोर तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना केली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिकेला दिला.
No comments:
Post a Comment