शासनाच्या आदेशानंतरही कल्याण पंचायत समितीत घरकुल योजनेबाबत जनजागृती फलक नाही !!
सामाजिक कार्यकर्ते पञकार विशाल कुरकुटे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
कल्याण | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. १७. एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या आवारात घरकुल योजनांमधील अनियमितता, दलालगिरी व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जनजागृती फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, कल्याण पंचायत समिती कार्यालयात अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल शांताराम कुरकुटे यांनी केला आहे.
यासंदर्भात विशाल कुरकुटे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कल्याण यांना लेखी निवेदन सादर करून शासनाच्या निर्देशानुसार तात्काळ जनजागृती फलक उभारण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, दलालांपासून सावध राहावे तसेच तक्रारींसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासन शासनाच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment