बस वाहतूक १०० टक्के क्षमतेने ! राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : ५० टक्के प्रवासी क्षमतेने धावणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना आता पूर्ण प्रवासी क्षमतेने (१०० टक्के) सेवा देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. शुक्रवारी गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करोनाकाळातील सर्व खबरदारीच्या उपाययोजना करूनच सेवा सुरू करण्याची अनुमती दिली. यात मुखपट्टी परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असेही स्पष्ट केले आहे.
यापूर्वी एसटीला १०० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर रिक्षाही पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागल्या. खासगी प्रवासी बस वाहतूकही पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्याची मागणी वाहतूकदारांकडून होत होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसची स्वच्छता व र्निजतुकीकरण, बसचे आरक्षण आणि चौकशी कक्ष यांची स्वच्छता ठेवणे, उपस्थित कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी व सॅनिटायझरचा वापर, बसमध्ये प्रवाशांसाठी अतिरिक्त मुखपट्टय़ा ठेवण्याचे नमूद केले आहे.
बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तापमापकाद्वारे तपासणीही करण्यात येणार आहे. एखाद्या प्रवाशाला ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारची करोना आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्याला प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना केल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास बस परवानाधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment