मी घरी बसणारा मुख्यमंञी नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !!
*रत्नागिरी, प्रतिनीधी (गणेश नवगरे)* - मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही, आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले. आमचं सरकार हे जनतेच्या हिताचं सरकार आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत शासन आपल्या दारी हा उप्रकम राबवण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. यावेळी लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारमधील कामाचा आढावा सांगितला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्यामुळे बसचा प्रवास वाढला. ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करु लागले आहेत. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
त्याचबरोबर, आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. चकरा, खेटे घेणे हे शब्द काढून टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले. आमच्या सरकारने ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल, केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. फंड देत आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी, तलाठी हे गावागावात जाऊ लागले आहे. सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ही दोन चाकं जेव्हा समान वेगाने धावतात तेव्हा त्या गावाचा, शहराचा त्या राज्याचा विकास होतो. आम्ही सरकार स्थापन केल्यापासून सगळे अधिकारी चांगलं काम करत आहेत. आता कलेक्टर आणि विभागीय आयुक्तही वेगाने काम करु लागले आहेत. यामुळे काय होतं की सरकारी यंत्रणा सक्रिय होते त्याचा लाभ लोकांना मिळतो.
आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असला तरीही कार्यकर्ता म्हणून कालही काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे आणि उद्याही त्याच भूमिकेतून काम करत राहीन. काम करण्याची जी सवय आहे, बाळासाहेबांनी आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली आहे, त्याच्या माध्यमातून राज्याला पुढे नेत आहोत. कुणाचीही गैरसोय होता कामा नये हे आमचं लक्ष्य आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पनाच आम्हाला नष्ट करायची आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment