राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ; "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" उत्साहात संपन्न !!
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय मुंबई, राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे ग्रामीण विकास व संस्कार शिबीर मु.पो. केळवणे, तालुका पनवेल या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एकूण ५२ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक सहभागी झाले होते. या गावातील हे पहिले शिबीर होते. शिबिराचे उद्घाटन सरपंच गुरूराज ठाकूर, पंचायत समिती सदस्या वैदेही घरत, समाजसेवक राजू मुंबईकर (रायगड भूषण पुरस्कार प्राप्त), विलासभाऊ ठाकूर व महानंदा ठाकूर यांच्या हस्ते व कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर, डॉ. विष्णू भंडारे व ऍड. दिपक पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले व शिबिराला औपचारिक सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी रोज सकाळच्या तीन तासांच्या श्रमदानातून ग्रामस्वच्छता व शून्य प्लास्टिक मोहीम यशस्वीरित्या राबवली व स्थानिक ग्रामस्थांना त्यांचे गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आवाहन केले. तसेच स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा या विषयावर पथनाट्याद्वारे गावातील विविध ठिकाणी जनजागृती केली. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचेही आयोजन केले होते, यामध्ये ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
रोज वेगवेगळ्या सामाजिक विषयावर बौद्धिक सत्रांचे आयोजन तेथील शाळेमध्ये व शिबिरात करण्यात आले होते. यामध्ये शिवाजी महाराजांची थोरवी, अंधश्रद्धा व बुवाबाजी, साप व पर्यावरण, व्यसनमुक्ती, कवितेतून प्रबोधन अशा महत्त्वाच्या विषयांवर निमंत्रित व्यक्तींची व्याख्याने झाली.यामध्ये विद्यार्थ्यांसह शाळेतील २०० पेक्षा जास्त विद्यार्थांचा उत्तम सहभाग लाभला. गावातील महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयासमोरील भव्य व्यासपीठावर करण्यात आले होते.यामध्ये ३२ मुलींसह ७० पेक्षा जास्त स्थानिक महिलांनी सहभाग घेतला.महिलांना तिळगुळ, भेटवस्तू वाटण्यात आल्या. त्यानंतर सर्व ग्रामस्थां साठी 'मनोरंजनातून प्रबोधन' अशा स्वरूपाचा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य, सामुहिक नृत्य, गाणी तसेच स्थानिक विद्यार्थ्यांनी देखील नृत्य व शिवाजी व संभाजी राजेंच्या जीवनावरील भाषणांचा समावेश होता. यामध्ये गावातील सहभागी व विजेत्या मुलांना बक्षिसे देण्यात आली.
प्रा. विशाल करंजकर सरांनी मुलांच्या उत्तम फिटनेस व आरोग्यासाठी नियमित रोज सकाळी सहा ते साडेसात या वेळेत हलका व्यायाम, कवायती व योगाचे विविध प्रकार त्यांना शिकवले. तसेच शेवटच्या दिवशी धावण्याच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक डॉ. समीर ठाकूर, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. कुंदन कांबळे, प्रा. सुमेध माने, प्रा. निर्मला कांबळे, वैभव महाडीक, ऍड. रेश्मा महाडीक यांनी शिबिराला भेट देऊन सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विलास ठाकूर,महानंदा ठाकूर, राजू मुंबईकर,राणीताई मुंबईकर व सरपंच गुरुराज ठाकूर व स्थानिक पत्रकार अजय शिवकर यांनी केलेले सहकार्य खूपच मोलाचे ठरले. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे आजी- माजी वरिष्ठ स्वयंसेवक विद्यार्थी ऋषिकेश सौंदाळकर, सागर, अधीरा, अर्पिता, विघ्नेश, तन्वी, आदित्य, विजय, आशिष, हर्षद, प्रियांका, प्रितेश, ओंकार, निलेश आदींनी सुट्टी घेऊन जमेल तसे शिबीरात सहभागी झाले व त्यांनी मनापासून सहकार्य केले.
No comments:
Post a Comment