कल्याण मध्ये विवाहितेची निर्घृण हत्या !!
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण शहरातील काळा तलाव परिसरात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांचा संशय महिलेच्या वडिलांवर असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील बारेकर वाडी येथील रचना रॉयल सोसायटीमध्ये राहणाऱ्या गायत्री शिंदे या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाणे चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महत्त्वाचा धागा हाती लागला. जिन्यातून एक व्यक्ती घाईघाईने बाहेर पडताना दिसून आली असून, ती व्यक्ती महिलेचे वडील विनोद वसईकर असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
या घटनेमुळे काळा तलाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment