Sunday, 30 August 2026

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

मुंबई–नाशिक महामार्गावर पडघा येथे मद्यधुंद कंटेनर चालकाचा धुमाकूळ; दुचाकीला धडक, तिघे जखमी !

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

मुंबई–नाशिक महामार्गावरील पडघा येथील एम.ई.सीबी पॉवर हाऊस गेटसमोर मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघांसह कंटेनर चालक  जखमी झाला असून, तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याची नोंद पडघा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. पडघा परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. कंटेनर उत्तर प्रदेश राज्यातील असून, चालकाचे नाव अमित पाठक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. दरम्यान, मुंबई -नाशिक  महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आलेल्या ब्रेकरमुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. महामार्गावर अवजड वाहने चालवताना चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. विशेषतः दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी !!

** ₹१२ कोटी हुन जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचा आरोप ; पत्रकार परिषदेत सर्व पत्रव्यवहार, कागदपत्रे, पुरावे दाखवून केली पोलखोल.

** ग्रामस्थांचा एल्गार घरपट्टी, पाणीपट्टी, बेकायदेशीर नोंदी व विकासकामांबाबत गंभीर आरोप; दोषींवर कारवाईची मागणी.

कोणतेही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय.

२ सप्टेंबर रोजी पंचायत समितीवर मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारणार,वेळ आल्यास ठिय्या आंदोलन करणार.

उरण दि. ३० (विठ्ठल ममताबादे) — नागाव ग्रामपंचायतीच्या कारभारात विविध शासकीय योजना, कर व विकासकामांच्या नावाखाली कथित गैरप्रकार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाची शासकीय स्तरावर सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीने केली आहे.माऊली रिसॉर्ट म्हातवली- उरण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत 
घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, बेकायदेशीर नोंदी, बनावट कागदपत्रे तसेच विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे आरोप संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. विकासाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली आहे.या कथित प्रकरणाची पंचायत समिती उरण यांच्याकडून कारवाई करण्यासंदर्भात होत असलेली टाळाटाळ तसेच विकासाच्या नावाखाली झालेला कथित अपहार याबाबतही या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून उपलब्ध शासकीय नोंदी, कागदपत्रे, निधीचा वापर आणि विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व प्रश्नांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने व दोषीवर त्वरित कारवाई व्हावी तसेच भविष्यात नागाव ग्रामपंचायत मध्ये कोणतेही भ्रष्टाचार होऊ नये या दृष्टीकोणातून रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता म्हातवली येथील माऊली रिसॉर्ट येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती . या पत्रकार परिषदेत कथित गैरव्यवहारासंदर्भातील मुद्दे व कागदपत्रे, सर्व पुरावे, कागदपत्रे माध्यमांसमोर मांडण्यात आले.संघर्ष समितीने सांगितले आहे की ....

“विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.


नागाव ग्रामपंचायतीतील आर्थिक अनियमिततां प्रकरणी शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाईची मागणी पत्रकार परिषदेत व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वप्नील माळी यांनी केली. यावेळी ते म्हणाले की नागाव ग्रामपंचायतीच्या कथित गैरकारभार, आर्थिक अनियमितता व ग्रामनिधीच्या वापराबाबत दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद, रायगड अलिबाग यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक सुनावणी घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशी अहवाल ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर १८ मे २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्तांनी आदेश पारित करून, नागाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच चेतन गायकवाड व ग्रामविकास अधिकारी किरण केनी यांच्याकडून अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबाबत तसेच महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २०१७ व  सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकातील निर्देशांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले असतानाही आजतगायत संबंधित दोषीवर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.केवळ रक्कम वसूल करून प्रकरण संपविणे योग्य आहे का ?  मुख्य प्रश्न असा आहे की, चौकशीत आर्थिक अनियमितता आढळल्यास केवळ संबंधितांकडून रक्कम वसूल करणे पुरेसे आहे का ? जर सार्वजनिक निधीच्या गैरवापराबाबत केवळ आर्थिक वसुली करून प्रशासकीय अथवा फौजदारी जबाबदारी निश्चित केली जात नसेल, तर भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा कसा बसेल, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आर्थिक अनियमिततेची रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितांची जबाबदारी निश्चित करून, लागू असलेल्या कायदे व शासन निर्देशांनुसार प्रशासकीय व आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी सर्व तक्रारदारांची तसेच ग्रामस्थांची मागणी आहे.असे स्वप्नील माळी यांनी सांगितले.

सतत पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून सुद्धा लोकशाही कायदेशीर व शांततेच्या मार्गाने लढाई लढून सुद्धा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी व्यक्तीवर कोणतेही कायदेशीर कारवाई होत नसल्याने प्रशासनाचा निषेध करत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असून बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर मोर्चा नेण्यात येणार असून गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. असा आक्रमक इशारा या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार तथा मार्गदर्शक काका पाटील यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेत नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सल्लागार काका पाटील, अध्यक्ष कल्पेश सुतार, उपाध्यक्ष विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील माळी, नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीचे सदस्य जितेंद्र ठाकूर, नितीन म्हात्रे, वीरेंद्र म्हात्रे, कमळाकर थळी, किशोर पाटील, निखिल माळी, भारतराज थळी आदी सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत ग्रामस्थही मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी भ्रष्टाचार बाबत ग्रामस्थ वर्गामध्येही संतापाचे वातावरण होते. त्यांनीही या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला व नागाव ग्रामपंचायत संघर्ष समितीच्या  निर्णयाला, भूमिकेला जाहीर पाठिंबा देत दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामनिधीतील सर्व खर्च, १५ /१६ वा वित्त आयोग निधी, ओएनजीसी कंपनी कडुन सी एस आर फंड , वाढीव ५ कोटी ५० लाख  निधीची चौकशी, पाणी पुरवठा योजणांचा निधी, विकासकामांचे अंदाज पत्रके व प्रत्यक्ष काम , मोजमाप पुस्तिका (MB ), मूल्यांकन व पूर्णत्व प्रमाणपत्रे, निविदा व कार्यादेश, साहित्य खरेदी व स्टॉक रजिस्टर, कॅशबूक व बँक व्यवहार, ठेकेदारांना दिलेली देयके, वकिलांना अदा केलेल्या फी, महानगर गॅस सुरक्षा अनामत, पंचायत समिती फंड, नागरिकांकडून जमा झालेली कररूपाने रक्कम, दैनदिन खर्च, किरकोळ खर्च, इतर खर्च आरोग खर्च, धूरफवारणी, स्टेशनरी खरेदी, सोलर पथदिवे खरेदी, पथदिवे लाइट खरेदी कर्मचारी वेतन व मानधन, शासकीय मालमत्तेची विल्हेवाट या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून या आर्थिक व्यवहारांचे विशेष व स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावे.तसेच तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, संबंधित गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, बांधकाम अभियंते, संबंधित अधिकारी कर्मचारी,कामांचे अंदाज पत्रक व मूल्यांकन करणारे अधिकारी, देयकांना मंजुरी देणारे अधिकारी, संबंधित कंत्राटदार व पुरवठादार यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम शासन निर्णय नुसार कायदेशीर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या कारभारात काही अनियमितता आढळल्यास संबंधित कायदे व शासकीय नियमांनुसार जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोट (चौकट ):- 

तक्रारदारांचा थेट सवाल.

"आर्थिक अनियमितता झाली आणि नंतर रक्कम वसूल केली, तर प्रकरण संपते का  ? "

सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न होत असल्यास, केवळ रक्कम वसूल करणे हा अंतिम उपाय असू नये. अनियमितता किंवा भ्रष्टाचार का झाली कोणत्या कारणामुळे झाली , त्यासाठी कोण जबाबदार आहे, निर्णय प्रक्रिया कोणी राबवली आणि ग्रामपंचायतीच्या निधीचे नुकसान का झाले, याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. अन्यथा "प्रथम निधीचा गैरवापर करा आणि नंतर रक्कम जमा करून प्रकरणातून सुटका करून घ्या" असा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो.त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरणमधील डाऊर  नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होत्या.

डॉ. मोहम्मद आमिर शेख सध्या पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेतली जात असून, पीएच.डी. पदवी संपादन करणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

उरण, रायगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. उरण परिसरातील एका तरुणाने अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या यशामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

या यशाबद्दल डॉ. आमिर शेख यांनी आपले वडील  रियाज अहमद, माजी उपप्राचार्य (निवृत्त), आई श्रीमती निशात बानो, पत्नी जैनब खातून, भगिनी, मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. मोहम्मद आमिर शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल उरण, रायगड परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सेंट विल्फ्रेड्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स महाविद्यालयात 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा !!

.               अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानक प्रमुख डॉ वरूण 

पनवेल, २४ ऑगस्ट २०२६: सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पनवेल येथे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त ‘स्पेस फ्रॉम द पोल्स’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, ध्रुवीय संशोधन आणि भारताच्या अंटार्क्टिका वैज्ञानिक मोहिमांची माहिती देणे हा होता.

यामध्ये कॉलेजजे प्राचार्य डॉ. जयंत के. बेहेरा, जे अंतराळ विज्ञान विषयात पीएच. डी. आहेत व XXXIII भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहिमेचे ते सदस्य आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अंटार्क्टिकामधील भारतीय स्थानक प्रमुख डॉ वरूण यांच्याशी विद्यार्थी व प्राध्यापकांनी थेट व्हिडिओ संवाद साधत तेथील जीवन, वातावरण, परिसर आणि सुरू असलेल्या वैज्ञानिक कार्याची माहिती जाणून घेतली.

सेंट विल्फ्रेड्स स्टेट बोर्ड आणि CBSE शाळांच्या प्राचार्यांच्या प्रोत्साहनामुळे इयत्ता ११वी व १२वीतील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत प्रश्नोत्तर सत्रात देखील सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन संशोधन कक्ष, नैसर्गिक विज्ञान विभाग आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाच्या  (IQAC) संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
 
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन आणि नव्या वैज्ञानिक क्षितिजांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची प्रेरणा मिळाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

*प्रा. पंकज सरवदे*
*(वाणिज्य विभाग प्रमुख)*

वृत्त - अश्विनी निवाते 

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते बाभुळगाव येवला येथे शाखा फलक अनावरण*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते बाभुळगाव येवला येथे शाखा फलक अनावरण*

येवला, प्रतिनिधी (सचिन ननगरे) : राष्ट्रीय रिपब्लिकन  पक्ष बाबुळगाव तालुका येवला शाखा फलक अनावरण राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. 

*"गाव तिथे शाखा"* निर्माण करणार असल्याचे यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
    
फलक उद्घाटन प्रसंगी बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन समाज जोडो अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष वाढीसाठी पदाधिकारी कार्यकर्ते अतोनात परिश्रम घेत आहेत त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात शाखा फलक उद्घाटन होत आहेत, प्रत्येक गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगीतले. 

शाखा उदघाटनाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपीन कटारे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पवार, येवला युवा नेते तुषार वाघ, नाशिक अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समीरभाई अन्सारी, येवला तालुका अध्यक्ष शिक्षण विभाग गजानन सुरेकर सर, तालुका उपाध्यक्ष गणेश कोतवाल, तालुका संघटक बबन वाघ, उपाध्यक्ष विजय वाघ, युवा नेते प्रशांत कटारे, अभिनव निकम,धीरज कोतवाल, सचिन देहाडे, तालुका संपर्क प्रमुख महिला आघाडी निर्मला भालेराव, बाभुळगाव शाखा अध्यक्ष कविता गायकवाड, उपाध्यक्ष स्वाती ताई सुरेकर, सचिव कविता अहिरे, कार्याध्यक्षा शिल्पा पठारे, संघटक शीतल कांबळे, खजिनदार सीमा बनसोडे, सल्लागार मनिषा बनसोडे, भारती पगारे, सुनीता बनसोडे, ताई अहिरे, ताई बाई गायकवाड, संजना गुंजाळ, मीनाताई पैठणकर, सुरेखा बनसोडे, जिजा भालेराव,सोनल बनसोडे आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत कृपा अडकूरकर प्रथम; विभागीय स्तरावर निवड !!

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत कृपा अडकूरकर प्रथम; विभागीय स्तरावर निवड !!

*पालघर, प्रतिनिधी / पंकज चव्हाण*

विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी कृपा अडकूरकर हिने जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पालघर येथील आर्यन हायस्कूलमध्ये आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कृपाने 'भारतीय ऊर्जा क्षेत्रे २०४७ : संधी आणि आव्हाने' या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर केले. भारतीय ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य, वाढती ऊर्जेची गरज, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, शाश्वत विकास तसेच २०४७ पर्यंतच्या संधी आणि आव्हानांचा तिने अभ्यासपूर्ण वेध घेतला.

*विभागीय स्तरावर निवड*

या यशामुळे कृपाची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने विज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणे ही उत्कर्ष विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

कृपाने मेहनत, विषयाचा सखोल अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती रेश्मा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

*अभिनंदनाचा वर्षाव*

कृपा अडकूरकर आणि मार्गदर्शक शिक्षिका रेश्मा जोशी यांचे मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर झेप घेणाऱ्या कृपाच्या या यशामुळे उत्कर्ष विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून विभागीय स्पर्धेसाठी संपूर्ण उत्कर्ष परिवाराकडून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

तिमुरेचे संकट परदेशातले असले तरी मदतीचा हात डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातून आला - भाविकांचा अनुभव

तिमुरेचे संकट परदेशातले असले तरी मदतीचा हात डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातून आला - भाविकांचा अनुभव

*मुंबई, दि. 30 ऑगस्ट 2026*

कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या आम्हा 43 यात्रेकरूंसाठी ही यात्रा अध्यात्मिक समाधानाबरोबरच मृत्यूच्या छायेतून परतण्याचा थरारक अनुभव ठरली, अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे.

नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर चीनमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना अखेर कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून सुखरूप भारतात परतण्यात यश आले आहे.

*तिमुरे येथील भीषण आपत्तीचा अनुभव*

रुद्र टूर अँड ट्रॅव्हल मार्फत मुंबई ते काठमांडू विमानाने आणि काठमांडू ते तिमुरेपर्यंत बसने प्रवास करून यात्रेकरू तिमुरे येथे मुक्कामाला होते. तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपुलकीने स्वागत केले होते. तिमुरे बॉर्डरवर इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून ते चीनमध्ये गेले.

चीनमधील कैलास-मानसरोवर येथे पोहोचल्यानंतर तिमुरे येथे दुर्घटना घडल्याची बातमी समजली. ज्या हॉटेलमध्ये चहा-नाश्ता केला, ज्या लोकांनी सेवा केली तेच लोक, परिसरातील हॉटेल्स, वाहने, रस्ते आणि नेपाळ-चीन सीमेवरील पूल या प्रचंड आपत्तीत वाहून गेले. चिनी बाजूकडील इमिग्रेशन सेंटरची भव्य इमारत, शेकडो वाहने आणि शेकडो भाविक या आपत्तीचे बळी ठरले.

*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने सुखरूप परतले*

सागा शहरात पोहोचल्यानंतर चीन सरकारच्या निर्बंधामुळे पुढील प्रवासावर निर्बंध आले आणि नेपाळमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद झाला. यावेळी 43 भारतीय यात्रेकरू आणि 9 नेपाळी कर्मचारी अडकले होते.

या संकटकाळात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, त्यांचे निकटवर्तीय अभिजीत दरेकर, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, आमदार राजेश मोरे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी घेतलेली काळजी आणि पाठपुरावा मोठा आधार ठरला.

ठाणे आरडीसी डॉ. संदीप माने यांनी तीन दिवसांत सहा वेळा स्वतः फोन करून विचारपूस केली. हा केवळ प्रशासकीय संपर्क नव्हता तर नातेवाईकाप्रमाणे आपुलकीने संवाद साधला. तहसीलदार विकास गारुडकर, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सातत्याने संपर्क ठेवत "तुम्ही एकटे नाही" असा विश्वास दिला. या यात्रेकरूं मध्ये फक्त भारतीय नव्हते त्यामध्ये भारतीय आणि लंडन, कॅनडा, फ्रान्समधील भाविक देखील होते. तसेच रुद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे त्यांचे ९ कर्मचारी भाविकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध होते. या सर्वांनी महाराष्ट्र प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले.

.           प्रकाश माने व प्रतिक्षा माने कैलास मानसरोवर यात्रेकरू 

अखेर दि. 29 ऑगस्ट रोजी चीन-नेपाळ जोडणाऱ्या कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी 6 वाजता प्रवास सुरू करून मध्यरात्री 2 वाजता ते काठमांडू येथील हॉटेलमध्ये पोहोचले. आज रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नेपाळ एअरलाइन्सच्या RA 201 विमानाने ते सुखरूप मुंबईत परतले.

तिमुरे येथील भीषण आपत्ती ही नैसर्गिक होती. मात्र संकटानंतर नागरिकांच्या पाठीशी कोण उभे राहते ही खरी कसोटी असते आणि या कसोटीत खासदार डॉ. शिंदे आणि महाराष्ट्र प्रशासनाने माणुसकीचे दर्शन घडवले, अशा शब्दांत यात्रेकरू प्रकाश माने आणि प्रतीक्षा माने यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...